आंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती; पात्र कुटुंबांना मिळणार हक्काची घरे

विशेषतः पावसाळ्यात घरे पाडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
State government gave Stay demolition of houses in Pune's Ambil stream
State government gave Stay demolition of houses in Pune's Ambil stream

मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन त्याबाबतचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी या वेळी दिली. (State government gave Stay demolition of houses in Pune's Ambil stream)

दरम्यान, या तोडकामाला न्यायालयानेही ७ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. हा प्रश्न शासकीय स्तरावर प्रश्न सोडवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु केल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. तसेच एका संघटनेच्या कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. विशेषतः पावसाळ्यात घरे पाडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्याची दखल घेवून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, झोपू प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निंबाळकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणतीही पूर्व सूचना न देता आंबिल ओढ्यातील रहिवाशांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे, ती तत्काळ थांबवावी. तसेच, ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करु नये, त्यासाठी  पर्यायी व्यवस्था करुन बाधितांना कायमची घरे देण्यात यावी, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी केली. त्यावर राज्य सरकार सर्वांना घरे देण्याबाबत सकारात्मक आहे.  कुणालाही बेघर करणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. सद्यस्थिती ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांचे पुनर्वसन केले जात असून येत्या काळात त्यांना हक्काची घरे देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी दिली.

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

नगरविकास मंत्री श्री शिंदे यांनी सूचना केल्याप्रमाणे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. यात आंबील ओढा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात पुढील माहिती जनतेसमोर वेळोवेळी पोचविण्याच्या दृष्टीकोनातून तपशील निश्चित करण्यात आला. याबाबत नागरिकांशी बोलून पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.

घरे पाडलेल्या रहिवाशांचे राजेंद्रनगरमध्ये स्थलांतर

आंबिल ओढ्यातील घराचे तोडफोड झालेल्या रहिवाशांचे स्थलांतर राजेंद्र नगरमध्ये केले जात आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईबाबत या पूर्वी रहिवाशांना आवाहन तथा सूचना देण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या स्वरुपात सर्वांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरु आहे. कोणालाही बेघर करणार नाही, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी मशाल सर्व्हे व झोपु प्राधिकरणाच्या यादीनुसार पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पा विषयी पाच जणांची समिती ही नेमण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com