पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून संग्राम यांना उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त सरकारनामाने दिले होते, हे वृत्त खरे ठरले आहे. देशमुख हे सांगली जिल्ह्यातले मोठं प्रस्थ आहे. त्यांचे दोन साखर कारखाने, सुतगिरण्या आणि शिक्षणसंस्थाही आहेत. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या बंधूंनीही पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळलेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुखासह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे यांच्यासह राजेश पांडे, शेखर चरेगावकर यांचेही नाव चर्चेत होती.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक एकत्रित लढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरूण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार म्हणून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने वकील असलेल्या रूपाली पाटील-ठोंबरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्याकडून जुन्यांना आव्हान#Nagar #BJP #Ahmednagar #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/sXJKhNzxCk
— Sarkarnama (@MySarkarnama) November 9, 2020
ठोंबरे पाटील या पुण्याच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी नगरसेविका म्हणून 2012 ते 2017 या दरम्यान काम केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या शैक्षणिक व सामाजिक कामे करत असतात. विधी क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. दरम्यान, सध्या त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा म्हणून जबाबदारी संभाळत आहेत.
पाटील म्हणाल्या, "गेल्या काही वर्षात पदवीधर आमदारांनी पदवीधरांसाठी काहीही केलेले नाही. पदवीधरांचे प्रश्नच सरकारी दरबारी प्राधान्याने मांडले जात नाहीत. पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी तयारी करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष, आमचे नेते राज ठाकरे यांच्याशी या संदरर्भात संपर्कात होते. त्यांच्याच आदेशाने पुणे पदवीधर मतदासंघातून अर्ज भरणार आहे.''
बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवून आपलं नशीब आजमावलं प्रयत्न केला आहे. आता ते पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत.
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ता. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

