राज ठाकरेंनी सांगितली आपल्या पहिल्या भाषणाची गंमत : घरी जाऊन लेहेंगा तपासला होता....

यावेळी माझाच माझ्यावर विश्‍वास नव्हता, घरी जाऊन आधी मी माझा लेहेंगा चेक केला.
Raj Thackeray  (17).jpg
Raj Thackeray (17).jpg

पुणे : ``शाळेत असताना मी कधीही भाषण केले नसले तरी भाषण करणाऱ्या मुलांबद्दल मला कुतूहल वाटायचे. १९९२ ला शिवाजी पार्कवर विजय मेळाव्यात मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) अचानक तू भाषण करणार ना? असे विचारत आग्रह केला आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायापुढे भाषण केले. यावेळी माझाच माझ्यावर विश्‍वास नव्हता, घरी जाऊन आधी मी माझा लेहेंगा चेक केला,`` अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाच्या आठवणींना उजाळा दिला.

मनसेतर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केल्याने त्यानिमित्ताने शिवशाहीर करंडक आयोजित केला होता. त्याची अंतिम स्पर्धा डी. पी रस्त्यावरील सृष्टी गार्डन येथे पार पडली, त्यावेळी विजेत्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे, शहराध्यक्ष वसंत मोरे आदी यावेळी उपस्थित होते.  

राज ठाकरे म्हणाले, ‘‘मी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत भीती वाटायची, पण जे बोलत त्यांचे कुतूहल वाटायचे. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकले आहेच, पण त्याचसोबत जाॅर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांची भाषणे ऐकली पण मी भाषण करेल, असे मला वाटले नव्हते. १९९२ ला बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या टिमला भारतात खेळू देणार नाही, असे दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितले आणि त्यानंतर पाकिस्तानने दौरा रद्द केला. हा आपला विजय असल्याने शिवाजी पार्कवर विजयी मेळावा घेण्याची कल्पना मी बाळासाहेबांना सुचवली, ते त्यास तयार देखील झाले. सभेत ५० फुटी पाकिस्तानी रावण तयार केला, संपूर्ण शिवाजी पार्क भरले होते, व्यासपीठावर आम्ही बसलेलो असतांना तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांनी मला ‘तू बोलणार आहेस ना?’ असे विचारले. त्यावर मी त्यांना ‘‘असले काही करू नका मी येथून निघून जाईल’’ असे सांगितले.

त्यानंतरही त्यांनी मला शिवाजी पार्कवर ऐनवेळी भाषण करायला लावले. हे माझे पहिले भाषण होते. त्यानंतर मी घरी जाऊन माझा लेहेंगा चेक केला, असे सांगत राज यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाची आठवण यावेळी करून दिली.

सरकार हवं ते करत फक्त लोकांनी जवळ येऊ नये

स्पर्धेचे आयोजन करताना मर्यादा आल्याने त्यावर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘‘ सध्या कोविडचा मूर्खपणा सुरू आहे. सरकारला हवे ते सर्व करत राहणार, फक्त लोकांनी जवळ यायचे नाही असे आहे. पुढच्या वर्षी आखणी वेगळ्या पद्धतीने करून कार्यक्रम करू.’’ असे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com