फडणवीस, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ यांच्यावर पुणे पोलिस गुन्हा दाखल करणार?

टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिच्या कुटूंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत असल्याने, वानवडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Chitra Wagh, .jpg
Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Chitra Wagh, .jpg

पुणे : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिच्या कुटूंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत असल्याने, वानवडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात अँड. रमेश खेमू राठोड यांनी पोस्टाने अर्ज केला आहे. 

या मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे निरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर, युवा मोर्चा पुणे शहर आणि इतर अनेक गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

पीडित कुटूंबाला पोलिस संरक्षण देण्याचाचीही मागणी करण्यात आली आहे. फ्लॅट बंद असतांना मोबाइल आणि लॅपटॉप मधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर कशी गेली, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांनाही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी समाजाची बदनामी होत असल्याने. संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी या प्रकरणी वाशिमच्या मानोरा पोलिस ठाण्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, शांताबाई राठोड यांच्यासह माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल केली आहे. मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली आहे. 

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजप नेते आणि प्रसार माध्यमे रोज बदनामी करीत असल्याने आम्ही त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यासाठी मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत; अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा श्याम राठोड यांनी या वेळी दिला.  

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली जात होती. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com