पायी जाणाऱ्या मजुरांचे दुहेरी हाल : पोलिस पकडून वाहनातून पुन्हा मागच्या हद्दीत सोडतात

घरी राहता येत नाही आणि पोलिस पुढे जाऊ देत नाहीत, अशी पायी जाणाऱ्या मजुरांची स्थिती आहे.....
pargaon-labor
pargaon-labor

पारगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. सुमारे दिड महीन्यांपासून लाखो परप्रांतीय मजुरांच्या हाताला काम नसल्याने उपासमार होऊ लागली आहे. हे मजूर पायी गावाकडे निघाले आहे. परंतु रस्त्यावर असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिस त्यांना अडवुन त्यांना पुन्हा वाहनात बसवून आलेल्या ठिकाणी पुन्हा नेऊन सोडत असल्याने त्यांनी दिवसभरात भर उन्हात 15 ते 20 किलोमीटर केलेली पायपीट वाया जात आहे. त्यांची ही परवड थांबणार कधी? शासन मजुरांच्या या प्रश्नावर गांभीर्याने पाहणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनो विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरी भागालगतच्या कंपन्या बंद आहेत. हातावर पोट असणारांचे रोजगार गेल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. लॉकडाऊन सुरु होऊन दिड महिन्यांचा कालावधी लोटल्याने या मजुरांचा संयम सुटू लागला आहे. संघटीत असलेल्या कामगारांनी शासनाकडे नोंदणी केल्यानंतर काही शहरात कामगारांना मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे व बसची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु ती साधने अपुरी पडत असल्याने हजारो परप्रांतीय मजूर पायीच मूळगावी निघाले आहेत.

पुणे- नाशिक महामार्गावर दर एक किलोमीटरच्या अंतरावर 10 ते 20 मजुरांचा तांडा भर उन्हात पाठीवर सामानाची पिशवी परत हातात एक पिशवी गेऊन गावाकडे निघाल्याचे विदारक दृष्य पहायला मिळत आहे. यामध्ये महिला, लहान मुले आहेत. काहींच्या पायात साधी चप्पलही नाही. गेल्या आठभरापासुन आंबेगाव तालुक्याच्या हद्दीतुन गेलेल्या पुणे- नाशिक महामार्गावरुन झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील मजुर जाताना दिसत आहे. रस्त्यावरील सर्वच हॉटेल बंद असल्याने कोणी काही खायला दिले तर एक वेळेचा जेवणाचा प्रश्न सुटत आहे नाहीतर मिळेल ते खाऊन गावाकडे त्यांची कूच सुरु असते. काल शुक्रवार (दि. 8) सायंकाळी छत्तीसगडचे जाणारे दहा ते वीस मजुरांना मंचर बसस्थानका जवळील तपासणी नाक्यावर अडवून पोलिसांनी टेम्पोमध्ये बसवुन पुन्हा वीस कोलोमीटर अंतरावरील खेड तालुक्याच्या हद्दीवर नेऊन सोडण्यास सांगीतले. परंतु सदर टेम्पोचालकाने त्या मजुरांना पाच किलोमीटर अंतरापर्यंत नेऊन रस्त्यावर उतरवुन दिले यामुळे दिवसभर उन्हात पायपीट केलेली वाया जात आहे. ही बाब मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांना समजल्यानंतर त्यांच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था केली. दिवसभर 15 ते 20 किलोमीटर पायी चालायचे पोलिसांची नजर पडली की पुन्हा परत सकाळी निघालेल्या ठिकाणी सोडले जाणार ही मजुरांची ससेहोलपट सुरु आहे. अशाच प्रकारे कनेरसर (ता. आंबेगाव ) येथुन उत्त प्रदेशात पायी निघालेल्या मजुरांना बेल्हे (ता. जुन्नर ) येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी अडवुन आंबेगावच्या हद्दीत आणुन सोडले रात्रभर डोंगरावर राहुन सकाळी खडकवाडीत हे मजुर आले असता येथील सरपंच अनिल डोके यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी त्या मजुरांना नाष्टा व पाणी देऊन कनेरसर येथे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.

याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले आमच्या हद्दीत आलेल्या मजुरांना माणुसकीच्या भावनेतुन स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने त्यांना जेवण देऊन आलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा नेऊन सोडत आहे. या मजुरांच्या बाबत शासनाच्या कोणत्याच सुचना नसल्यामुळे आम्हाला काही करता येत नसल्याने नाईलाज आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com