राजगुरुनगर (जि. पुणे) : केंद्र सरकारच्या कृषी विषयक विधेयकामध्ये, बाजार समित्यांविषयक तरतुदी आता मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे आता वाद घालण्यात अर्थ नाही, त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन स्पर्धेत बाजार समित्यांनी उतरले पाहिजे,' असे मत महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष, कृषी आणि पणन मंडळ संचालक आणि खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राजगुरूनगर मुख्य बाजार आवारामध्ये सुरू करण्यात आलेल्या किसान जलपान सेवा केंद्राचे उद्घाटन मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धा. कृ. गवारी, प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे आणि सर्व संचालक उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, "आपण आता नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी सुविधा व साधन सामुग्री निर्माण केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे शेतकरी बाजार समितीत येतील. तसेच सक्षम राहण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवली पाहिजेत.'
खेड बाजार समितीने व्यापारी संकुले उभारावीत. फळांचा बाजार सुरू करता येईल का? याचा विचार केला पाहिजे. खेड तालुक्यात 3 धरणे असल्याने, येथे मासळीबाजार सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. तालुक्यातील एमआयडीसीकडे जागा मागून लॉजिस्टिक सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. संचालकांनी मॉडेल बाजार समिती निर्माण करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
बाजार समितीने नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू करून कांद्याला चांगला भाव मिळवून देण्याबरोबर, बाजार समितीचे उत्पन्नही वाढविले आहे. पाईट आणि डेहणे उपबाजार आवारात संरक्षण भिंती बांधल्या आहेत, असे बाजार समितीचे सभापती घुमटकर यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.