ज्यांच्या मंत्रिपदासाठी खडसेंनी स्वतःचे पद पणाला लावले ते समर्थक पण `नाॅटरिचेबल`

पुण्यात खडसेंचा एकमेव खंदा समर्थक होता...
Eknath Khadse
Eknath Khadse

पुणे : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे खानदेशात मोठ्या प्रमाणात समर्थख असले तरी पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्यांना फारसे समर्थक नाहीत. पुण्यात त्यांचे एकमेव कट्टर समर्थक म्हणजे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे. मात्र ते कांबळेही भाजपसोबतच राहणार आहेत.

दिलीप कांबळे आणि खडसे यांचे संबंध अत्यंत निकटचे होते. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत कांबळे यांचे नाव नसल्याचे समजताच खडसे यांनी, कांबळे यांचा शपथविधी झाल्यावर मी मंत्रिपदाची शपथ घेईन, अशी टोकाची भूमिका घेतली. शेवटच्या क्षणी भाजपाला कांबळे यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले जाते. तेव्हाच खडसे हे स्वतः शपथ घेण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येते. खडसे हे पुण्यात आल्यानंतर कांबळे यांच्याशी निवांत गप्पा मारायचे. कांबळे यांचे बंधू सुनील हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे आमदार आहे. सुनील हे पुणे महापालिकेचे सदस्यही आहेत.

ज्यांच्यासाठी खडसेंनी इतकी टोकाची भूमिका घेतली ते कांबळेही आज फोन स्वीकारत नव्हते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी `सरकारनामा`ने वारंवार प्रयत्न केले. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना खडसे यांच्या पक्षत्यागामुळे भारतीय जनता पक्ष आणि स्वत: खडसे या दोघांचाही तोटा होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की नाथाभाऊ यांचा पक्षत्याग ही माझ्यासाठी अत्यंत दु:खद आणि वेदनादायक बातमी आहे. त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीत भारतीय जनता पक्षासाठी ४० वर्षे खस्ता खाल्ल्या. प्रसंगी मोठा त्यागही केला. त्यामुळे ही घटना टळावयास हवी होती. मतभेद होते तर मार्ग काढता आला असता. संपूर्ण राज्यात, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाथाभाऊंबद्दल आत्मीयता होती. दुदैवाने त्यांनी पक्षत्याग केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन खडसे यांचा उचित सन्मान राखला जाईल का, याबद्दल मी साशंक असल्याचे कांबळे म्हणाले. खडसे यांच्या पक्षत्यागामुळे त्यांच्याबरोबरच भाजपचेही नुकसान होईल, असे मला वाटते.

...........

रावसाहेब दानवे खडसेंविषयी काय म्हणाले?

पुणे : एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्ष सोडून गेल्याचे दुःख आम्हाला नक्कीच आहे. मात्र, नाथाभाऊ हे पूर्वीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेच समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पूर्वी एस कॉंग्रेसमध्ये होते, असा पुनरुच्चार केंद्रीय राज्यमंत्री रावासाहेब दानवे यांनी केला. 

भाजपचे ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे हे आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

ते म्हणाले की, नाथाभाऊ पक्ष सोडून गेल्याचे दुःख आम्हाला नक्कीच आहे. मात्र, नाथाभाऊ हे पूर्वीपासून शरद पवार समर्थकच आहेत. कारण, पूर्वी खडसे हे एस कॉंग्रेसमध्ये होते. शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती. त्यात ते सहभागी झाले होते.' 

दरम्यान, यापूर्वीही दानवे यांनी असाचा आरोप खडसे यांच्यावर केला होता. मात्र, त्या वेळी खडसे यांनी त्याचा इन्कार करत आपण कधीही कॉंग्रेसमध्ये नव्हतो, असे सांगून दानवे यांना आव्हान दिले होते. 

या वेळी दानवे यांनी "माझ्या पोटात अनेक गोष्टी आहेत,' असे सांगून पक्षातील अनेकांना गॅसवर बसवले आहे. मी मात्र, मूळच्या जनता पक्षापासून भाजपबरोबर आहे, असे नमूद केले. 

आम्हाला उत्तर महाराष्ट्राची अजिबात चिंता नाही. कारण, नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची क्षमता राज्यस्तरीय आणि जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन हे जळगावात तर, खासदार भांबरे, हिना गावीत हे धुळे, नंदूरबारमध्ये पक्षवाढीसाठी सक्षम आहेत, असा दावा दानवे यांनी केला. 

निर्णय करण्याची भारतीय जनता पक्षात एक प्रक्रिया आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपत फडणवीस एकटे निर्णय घेत नाहीत. आमचा पक्ष कोणा एकावर अवलंबून नाही, असेही दानवे म्हणाले. 

पक्षांतर करताना आमच्या भागाचा विकास करण्यासासाठी सरकारसोबत जात आहे, असे नेत्यांना बोलावे लागते. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मला सरकारसोबत जावे लागले, असे हे ते बरोबर बोलले आहेत. भाजपचा एकही आमदार राष्ट्रवादीत जाणार नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी दावा केला. 

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करावा 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटतं असेल निवडणुकीपूर्वी भाजपने आम्हाला डॅमेज केले. त्यामुळे खडसेंसारखा नेते फोडून भाजपचे नुकसान करता येईल. नाथाभाऊंचा उपयोग विरोधी पक्षावर तोफ डागण्यापेक्षा राज्याच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही दानवे यांनी या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com