जयंतराव, फुकट मिळाले आहे ते आधी पचवा : चंद्रकांतदादांची टीका

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या प्रचाराची रंगतदार सुरूवात...
jayant patil-chandrakant patil
jayant patil-chandrakant patil

पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कलगीतुरा रंगणार असल्याचा अंदाज खरा ठरणार असून त्याची चुणूक आज पुण्यात मिळाली. पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जयंत पाटील यांनी सरकार पडण्याच्या भाजपच्या दाव्याची खिल्ली उडवली होती. त्याला तितकेच तिखट उत्तर चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. त्यामुळे आगामी काळात या दोघांत आणखी वाद-प्रतिवाद रंगणार असल्याचे आज दिसून आले.

महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्या अंतर्विरोधाने पडणार, असा दावा भाजपचे नेते करत असतात. त्याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी असे बोलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस पर्याय नाही. तसे बोलले नाही तर त्यांच्या पाठीमागे असलेले आमदारांचे सैन्य केव्हाच निघून जाईल, असे सांगितले होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असा दावा भाजप करीत असले, तरी राज्य सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढील चार वर्ष भाजपला सरकार पडेल, अशी स्वप्नच बघावे लागेल, असा सल्ला त्यांनी दिला होता.

त्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 'जयंत पाटील यांनी आमची काळजी करू नये. त्यांना जे फुकटात मिळाले आहे, आधी ते पचवावे आणि नंतरच आम्हाला सल्ले द्यावेत,' असा पलटवार त्यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार हे नवीन काहीच करीत नाही, केवळ जुने जे निर्णय घेतले आहेत, ते रद्द करण्याचे काम करीत आहे, अशी टिका त्यांनी यावेळी केली.

पुणे पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी अशा पलटवार केला. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे निवडणूक प्रमुख राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता पाटील म्हणाले,"" राऊत यांना सल्ला देण्यासाठी खरंतर दिल्लीत पाठवले पाहिजे. अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती.''

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजप कडून अनेक जण इच्छुक होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत होते. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पदवीधर सारखे निवडणुकीत आणि पाच जिल्ह्यांत फिरवावे हे काय योग्य वाटत नाही. त्यांना आम्ही मोठी जबाबदारी देणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाल्यानंतर ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या संग्राम देशमुख यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com