लोकसभेला पराभूत झाल्यापासून आढळराव बैचेन  : गारटकर

राज्यात एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षात जिल्ह्यात विशेषतः शिरूर मतदारसंघात चांगला वाद पेटला आहे.
Adhalrao upset over Lok Sabha defeat: Pradip Garatkar
Adhalrao upset over Lok Sabha defeat: Pradip Garatkar

पुणे : राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित काम करत आहेत. जिल्हा पातळीवर खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासारख्या छोट्या छोट्या प्रश्नांवर राजकीय पक्षात वैचारिक मतभेद असू शकतात. पण, त्याबाबत मित्रपक्षांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. परंतु शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेला पराभूत झाल्यापासून बैचेन आहेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी लगावला आहे. 

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यात मात्र राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एका व्यंग्यचित्राच्या माध्यमातून शिवसैनिकांनी विशेषतः आढळरावांच्या समर्थकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टिकेचे बाण सोडले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात खासदार मतदारसंघात फिरकत नाहीत, असा आरोप करून ते मतदारसंघाऐवजी चित्रीकरणात व्यस्त आहेत, असेही म्हटले गेले. 

शिवसेनेच्या आरोपाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले. आढळराव हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा आरोप करण्यात आला. राज्यात एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षात जिल्ह्यात विशेषतः शिरूर मतदारसंघात चांगला वाद पेटला आहे. 

आजी-माजी खासदारांच्या वादाचा धुरळा खाली बसतोय, असे वाटत असतानाच या लोकसभा मतदारसंघातील खेड पंचायत समितीच्या इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आला. खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या विनंतीनुसार, "पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम सध्या निश्‍चित केलेल्या जागेवर करण्याचे थांबवावे आणि मूळ पंचायत समितीच्या परिसरात ही इमारत बांधण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करावी,' असे तोंडी आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हे काम थांबले. 

त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विनंतीवरून खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र देऊन हे काम पूर्वीच्या मंजुरीप्रमाणे ठरलेल्या जागी अगोदर दिलेल्या कार्यारंभ आदेशाप्रमाणे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असे सांगितले. त्यानुसार सत्तार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद काम सुरु करण्याचा आदेश दिला. 

त्यावर आमदार मोहितेंनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव घेतली. मुश्रीफांनी जिल्हा परिषदेस कोविडच्या परिस्थितीमध्ये नवे बांधकाम करता येणार नाही, असे सरकारी निर्णयाच्या आधारे सांगितल्याने जिल्हा परिषदेसमोर पेच उभा राहिला आहे. या दोन्ही मंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांना दूरध्वनी करून मी सांगितल्यानुसारच कृती करायची, असा आदेश दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. 

या सर्व प्रकरानंतर आज आढळराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यात आढळरावांनी पुणे जिल्हा परिषद ही राजकारणाचा अड्डा बनली असल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी उत्तर दिले आहे. लोकसभेला पराभूत झाल्यापासून आढळराव हे बैचेन आहेत, असे म्हणत त्यांनी आढळरावांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com