एस. एम. जोशींनी गळ घातली अन्‌ निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली!

मोरारजी देसाई यांचे तर ते मानसपुत्रच होते.
S. M. Joshi insisted on candidature and Sambhajirao Kakade of Nimbut reached Delhi
S. M. Joshi insisted on candidature and Sambhajirao Kakade of Nimbut reached Delhi

सोमेश्वरनगर (जि. पुणे) :  ती १९७७-७८ मधील आणीबाणीनंतरची लोकसभा निवडणूक. जनता पक्षाकडून ४८ पैकी ४७ मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाले. पण, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळेना. अखेर एस. एम. जोशींनी (S. M. Joshi) चळवळीतून आलेल्या लालांना (संभाजीराव काकडे) (Sambhajirao Kakade) अनपेक्षितपणे गळ घातली. समोर काँग्रेसचे दिग्गज व सुसंस्कृत नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ (Vitthalrao Gadgil) होते. पुण्याची जिल्हा परिषद, नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात. शिवाय, खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी प्रचारसभा घेतली. परंतु आणीबाणीसाठी तुरूंगात गेलेल्या लालांची हवा काँग्रेसला बाधली आणि निंबुतच्या लालांनी थेट दिल्ली गाठली! (S. M. Joshi insisted on candidature and Sambhajirao Kakade of Nimbut reached Delhi)

माजी खासदार व समाजवादी नेते संभाजीराव (लाला) काकडे हे निंबुत (ता. बारामती) येथील सहकारमहर्षी (कै.) मुगुटराव काकडे व सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष (कै.) बाबलाल काकडे, राज्य पणन महामंडळाचे उपाध्यक्ष शामकाका काकडे यांचे ते बंधू होते. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रामीण राजकारणात लालांनी रस न घेता वरीष्ठ पातळीवर काम केले. सुरुवातीला त्यांनी पुणे जिल्हा सहकारी औद्योगिक सोसायटीचे महाव्यवस्थापक म्हणून पुणे शहरात काम केले.

त्यावेळी पानशेत, वरसगाव, कुकडी धरणग्रस्तांसाठींचे आंदोलन अथवा दुर्गम भागातील वाहतूक सुविधांसाठीचे आंदोलन केले. ते पाहून तत्कालिन नेते मालोजीराजे निंबाळकर यांनी काँग्रेसमधून फुटलेल्या संघटन काँग्रेसचे त्यांना जिल्हाध्यक्ष केले. लालांनी या पक्षाचे अधिवेशन शनिवारवाड्यासमोर मोरारजीभाई देसाई यांच्या उपस्थितीत घेऊन संघटनकौशल्य दाखवून दिले. पुढे जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासोबत देशातील समाजवादी चळवळीत वाढले. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर हे त्यांचे जवळचे मित्र, तर मोरारजी देसाई यांचे तर ते मानसपुत्रच होते.  

विधान परिषदेवर आमदार 

विधान परिषदेच्या 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसने साताऱ्याच्या रंगराव पाटील यांना संधी दिली. नगरपालिका, जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व. त्यामुळे मते खेचून आणणारा उमेदवार हवा म्हणून ‘सकाळ'चे संस्थापक नानासाहेब परूळेकर यांनी संभाजीराव काकडे यांना पाठींबा दिला. खुद्द यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासह डझनभर मंत्री पुण्यात तळ ठोकून बसलेले असतानाही लालांनी २२ मतांनी विजय मिळविला. यानंतर ऐंशीच्या दशकात लाला व बी. डी. किल्लेदार हेच पुण्याचा महापौर ठरवत.
 
लोकसभा जिंकली; पण मंत्रीपद हुकले

मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली लाला जनता पक्षात सामील झाले. आणीबाणीच्या काळात आंदोलन केले. आणीबाणीनंतरच्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वाटप एस. एम. जोशी, स. का. पाटील, वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील, पन्नासाल सुराणा व लाला करत होते. बारामती मतदारसंघाची जबाबदारी लालांवर टाकण्यात आली. काँग्रेसकडे नगरपालिका, जिल्हा परिषद व सहकारी संस्था होत्या. लालांनी एका जीपमध्ये प्रचार करत विजयी रणशिंग फुंकले. पुणे जिल्ह्यातील खासदार असल्याने मोरारजी देसाई यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लालांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले होते. लाला शपथविधीच्या तयारीने दिल्लीलाही गेले. परंतु राज्यातील ओढाओढीच्या राजकारणामुळे त्यांची संधी हुकली.  


निवडणुका सोडून चळवळीत सक्रीय 

विधानसभा लढवायची इच्छा नसताना लालांनी जनता दलाकडून १९९० बापूसाहेब थिटे यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा १९९४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. जनता पक्षही आक्रसत गेला, त्याची शकले झाली आणि हिंदुत्ववादी राजकारणाने महाराष्ट्र ढवळून काढला. त्यामुळे लालांनी निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, जनता दलाने त्यांना राज्यसभेवर पाठवायचे ठरविले. परंतु ऐन मतदानावेळी कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार रेल्वेस अडथळा आल्याने वेळेत पोचू शकला नाही आणि अर्ध्या मतांनी लालांचा पराभव झाला. यानंतर लालांनी दूध, कांदा यासाठी आंदोलन केले. विशेषतः एन्रॉनविरोधी आंदोलनात ते जास्त सक्रीय होते. आदिवासींसाठी हिरडा सहकारी संस्थेची स्थापना त्यांनी केली. रावसाहेबदादा पवार यांना घोडगंगा साखर कारखाना उभारणीत मोलाचे सहाय्य केले. मुंबई बाँबस्फोट, बाबरी मशीद विध्वंस या प्रकारांनी ते व्यथित व्हायचे. 

खुद्द यशवंतरावांनी निरोप देऊनही काँग्रेसमध्ये जाणे टाळले

सोमेश्वर कारखाना, बारामती तालुका यातील राजकारणात मात्र त्यांनी फारसा रस घेतला नाही. तालुक्यातील २२ जिराईत गावांबाबत मात्र पोटतिडकीने बोलत असत. राज्याच्या राजकारणातील गोपीनाथ मुंडें-किसनराव बाणखेलेंपासून ते विजय शिवतारे यांच्यापर्यंत नव्या पिढीचे ते सल्लागार होते. लाला अर्बन बँक त्यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी निरोप देऊनही त्यांनी काँग्रेसमध्ये जाणे टाळले. समाजवादी विचारांशी त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा जपली. सध्याच्या दलबदलू व वैचारिकतेशी देणेघेणे नसलेल्या राजकारणात लालांचे महत्व आणखीनच अधोरेखित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com