सोलापूर : "राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे आपण कधीही म्हटलो नाही. ते कधी पडेल, हे सांगण्यासाठी मी काय ज्योतिषी नाही,'' अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत भाजप नेत्यांकडून होणाऱ्या दाव्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील यांच्या समवेत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची अगोदर देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यामुळे मनसेसोबतच्या भाजप युती करणार का? याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला तरी परप्रांतियाबाबत ते जोपर्यंत भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी युती करता येणार नाही, ही भाजपची भूमिका आहे, असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
विनाकारण सीमावाद
सरकारी मदत नाही व विमा भरपाई नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली आहे. केंद्राच्या कृषी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्वीपासून महाराष्ट्रात सुरू आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारचे नेते ओबीसीविरुद्ध मराठा असा वाद लावून मूळ आरक्षणाबाबत दिशाभूल करीत आहेत. मराठा आरक्षण करायचे नाही, म्हणूनच आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उकरून काढला जात आहे. प्रत्यक्षात कर्नाटकातील 842 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यावीत, अशी आमची भूमिका आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते
पाटील म्हणाले, "सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः त्या महिलेशी असलेले संबंध व झालेल्या मुलांना स्वतःचे नाव दिल्याचे सांगितले आहे. हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते किंवा त्यांनी निवडणूक शपथपत्रात नोंद केली आहे का? हा मुद्दा असताना रेणू शर्मा प्रकरणाकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून निर्णय घ्यायला हवा. या सर्व प्रश्नावर आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत.''
अण्णांनी या वयात उपोषण करू नये, अशी आमची भूमिका
केंद्राचे कायदे आधीपासून महाराष्ट्रात लागू आहेत, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण नाही. मग चर्चेत सहमती न करता वाद वाढवणे, प्रजासत्ताकदिनी हिंसा करणे या प्रकारामागे काय आहे, असा प्रश्न पडतो. राज्य घटनेची शपथ घेणारे प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेचे समर्थन कसे करू शकतात? हा खरा प्रश्न आहे. हिंसा व हिंसेच्या समर्थकांचा आम्ही निषेध करतो. अण्णा हजारे यांनी या वयात उपोषण करू नये, ही भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याशी बोललो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.