लोणी काळभोर (पुणे) : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्याच्या घटनेस जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पदभार स्वीकारल्यापासून संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील 66 गुन्हेगारी टोळ्यांतील 444 गुन्हेगारांवर "मोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाई केली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 661 गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायद्यांतर्गत जिल्ह्याबाहेर तडीपारीची कारवाई केली आहे.
पुणे जिल्ह्याचे अधीक्षक झाल्यापासून संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी "मोका' अंतर्गत 444, तर 661 गुन्हेगारांना तडीपार करून दोन वर्षांत 1105 गुन्हेगांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचा इतिहास पाहता 1105 गुन्हेगारांवर कारवाई ही संदीप पाटील यांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई ठरली आहे. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे जिल्हातील संघटीत गुन्हेगारी विश्वाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
सातारा जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम करताना संदीप पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यावरील मोका कारवाईची शंभरी गाठली होती. यामुळे संदीप पाटील यांची बदली पुणे ग्रामीणला होताच जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांवर मोका कारवाईची शंभर पूर्ण करतात का? याकडे लक्ष लागून राहिले होते.
मागील दोन वर्षांत संदीप पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यावरील मोका कारवाईची शंभर गाठली नसली तरी, जिल्ह्याच्या विविध भागातील 66 गुन्हेगारी टोळ्यांमधील 444 गुन्हेगारांना मोक्का, तर 661 जणांना तडीपार अशा अकराशेहून अधिक पॉवरफुल गुन्हेगारांचे कंबरडे मोडल्याने सर्वसामान्य नागरीक त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत.
संदीप पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी अधीक्षक पदाची सुत्रे हाती घेताच, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना राहावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना हद्दीतील सराईत गुन्हेगार, गुंड, बेकायदा सावकारे, जबरी चोरी व घरफोडी करणारे, झोपडीपट्टी दादा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यातूनच संदीप पाटील यांनी ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली आहे.
पाटील यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात दीपक धनकुटे (लोणी काळभोर पोलिस ठाणे) पिन्या काळे (लोणीकंद ठाणे), राहुल ढावरे, सचिन पडळकर (बारामती शहर पोलिस), आदिनाथ भोसले (बारामती ग्रामीण), कुलदीप वाल्मीकी, शुभम गोळे व स्वप्निल पडळकर (वेल्हे पोलिस ठाणे), युवराज माने (कामशेत पोलिस), मंगेश कदम (सासवड पोलिस), निरंजन पवार (वालचंदनगर पोलिस), आकाश कोळेकर (इंदापूर पोलिस), देवगण चव्हाण (दौंड) व चेतन निम्हण (हवेली) या प्रमुख टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा, कोरेगाव भीमा येथील प्रकरण ताजे असल्याने सहा ते सात महिने त्याच प्रकरणावर लक्ष द्यावे लागले. त्यामुळे पहिले सहा ते सात महिने गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करता आली नव्हती. मात्र त्यानंतर गुन्हेगारीचे मूळ शोधून पोलिसांना थेट कारवाईचे आदेश दिले.
दोन वर्षांपूर्वी वाळू व्यवसायाबरोबरच, जिल्ह्याच्या विविध औद्योगिक वसाहतीमधील अनेक गुन्हेगार समाजात खुलेआम फिरत होते. ते सर्वजण आज गजाआड आहेत. या कारवाई बरोबरच तीस गुन्हेगारी टोळ्यांवर झोपडपट्टीदादा विरोधी कायदा (एमपीडीए) या अंतर्गत कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील अकराशेहून अधिक गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई केलेली असली तरी, त्यावर समाधानी नाही. आगामी काळातही संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या अनेक रथी महारथींवर मोकाची कारवाई झालेली दिसेल, असाही इशारा त्यांनी या वेळी बोलताना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.