सासवड (जि. पुणे) : एक पारगाव वगळून पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करा आणि बाधितांना द्यावयाचा मोबदला तत्काळ जाहीर करा. मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील, अशी मागणी शिवसेनेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र पाठवून केली आहे.
पवार यांना लिहिलेल्या पत्रात शिवतारे यांनी म्हटले आहे की, पुरंदर तालुक्यातील राजुरी, रीसे, पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावांत विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नाही, त्यामुळे जागा बदलण्यास आपला विरोध असल्याचे शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.
याबाबतचे पत्र शिवतारे यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे. शिवतारे पत्रात म्हणतात की, गायरान दोन्ही ठिकाणी किरकोळ स्वरुपात आहेत. वनजमिनीसुद्धा फार नाहीत. याउलट जुन्या गावांमध्ये 2001 पासून आजपर्यंत जवळपास 3,500 एकर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत. म्हणजेच बाहेरून आलेल्या भांडवलदार लोकांनी किंवा व्यावसायिकांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी लागणार आहेत. नवीन जागेचा हट्ट कायम ठेवल्यास परवानग्या आणि इतर कामात मोठा वेळ वाया जाण्याचा धोका आहे. समृद्धी महामार्गाचे आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहे.
शिवतारे म्हणाले, समृद्धी महार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. पण सरकारने मोबदला जाहीर केल्यावर त्याच शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येत सरकारला स्वखुशीने जमिनी बहाल केल्या. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतही सरकारने मोबदला जाहीर केल्यास आणि तो समाधानकारक असल्यास शेतकरी मोठ्या मनाने सकारात्मक होतील.
शिवतारेंनी सांगितली यशवंतराव चव्हाणांची आठवण
शरद पवार या यांना लिहिलेल्या पत्रात विजय शिवतारे यांनी, यशवंतराव चव्हाण यांची एक सुंदर आठवण करून दिली. उजनी धरण उभारताना शेतकऱ्यांनी आणि विशेषतः वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण यशवंतरावांनी मनोमन पांडुरंगाची माफी मागितली आणि धरण पूर्ण केले. पुढे त्याच उजनी धरणाने संबंध पश्चिम महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकल्याचे शिवतारे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी तेवढा त्रास माझ्यासहीत आपल्यालाही सहन करावा लागेल, असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.

