अजित पवार म्हणतात, भामा आसखेड जलवाहिनीचे काम मागच्या सरकारने सुरू केले 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे काम सुरू करण्यात आल्याचे त्या वेळी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले होते. त्या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवाल विचारला होता.
Bhama Askhed project affected farmers meet to Ajit Pawar
Bhama Askhed project affected farmers meet to Ajit Pawar

आंबेठाण : भामा आसखेड धरणाहून पुण्याला करण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम मी सुरू केले नाही, तर ते मागच्या सरकारने सुरू केले आहे. सध्या पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे, असे माझ्या कानावर आले आहे. याबाबत 12 तारखेला जिल्हाधिकारी बैठक घेतील. त्याअगोदर आमदार, खासदार यांची बैठक घेतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना शुक्रवारी दिली. 

दरम्यान, आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भामा आसखेड जलवाहिनीचा तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. 

वहागाव (ता. खेड) येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करून भामा आसखेड धरण ते पुणे जलवाहिनीचे काम बंद पाडले होते. पण प्रशासनाने ते पोलिस बंदोबस्तात सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे काम सुरू करण्यात आल्याचे त्या वेळी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले होते. त्या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवाल विचारला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी अजित पवार बोलत होते. 

आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रारही त्यांनी या वेळी केली. 

या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काम बंद पाडणार 

आम्हाला पोटापुरते पाणी राखीव ठेवून पात्र खातेदारांना जमिनीला जमीन आणि अपात्र खातेदारांना पॅकेज द्यावे, अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. पण सरकारकडून लेखी आश्वासन देऊनसुद्धा आमची फसवणूक केली जात आहे. पोलिस बळाचा वापर केला जात आहे. हा आमच्यावर अन्याय असून तो आम्ही सहन करणार नाही. उलट मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत सुरू केलेले जलवाहिनीचे काम बंद करणार असून त्याविरोधात आंदोलन उभारणार असल्याचा निर्धार भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

खातेदार जास्त आणि जमीन कमी म्हणून काहीतरी मार्ग काढावा; म्हणून आम्ही अपात्र शेतकऱ्यांसाठी पॅकेजचा मार्ग स्वीकारला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी लेखी दिल्यानुसार पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेने सुचविलेल्या एक किलोमीटर अंतरातील जलवाहिनीचे काम थांबविण्यात येईल, असे ठरले होते. 
- देविदास बांदल, प्रकल्पग्रस्त आंदोलक शेतकरी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com