ओतूर ः कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात चांगले काम करीत असतानाही भारतीय जनता पक्ष मात्र राजकारण करत असल्याने त्यांनी आता वेळीच सुधारण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भाजपला दिला
कोरोनाचे संकट आल्यापासून राज्यात भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी चुकीची भूमिका घेतली आहे. खासगीत भाजपचे कार्यकर्तेदेखील हे मान्य करीत आहेत. विधानसभेत एकशे पाच आमदार असूनही भाजपला सरकार स्थापन करता आले नाही, त्यामुळे राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. भारतीय जनता पक्षावर कुठेतरी अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत होती. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारची सहानुभूती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप तटस्थ राहिला असता, सरकारला मदत केली असती तर ही सहानुभूती टिकून राहिली असती. लोकांना देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सुरुवातीला हवेहवेसे वाटत होते; पण आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक असल्यासारखी भूमिका करत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. त्यांनी वेळीच सुधारले तरच लोक त्यांचा विचार करतील, असेही आढळराव यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे, मांडवे या गावात संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक, किराणा वस्तूंचे वाटप करण्यासाठी आढळराव पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, प्रकाश शेटे, मंगेश काकडे, मंगल उंडे, गेणू उंडे, योगिता दाभाडे व इतर उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.