बबनदादा शिंदे यांची आमदारकी वाचली : उजनीचा लेखी आदेश निघाला

आता बबनदादांना आमदारकीचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही.
A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani
A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani

पुणे :  उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेले 5 टीएमसी पाण्याचा आदेश आज (ता. २७ मे) रद्द करण्यात आला. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी याबाबतचा लेखी आदेश काढला आहे. (A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani)

दरम्यान, उजनी धरणाच्या पाण्यासाठी आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, उमेश पाटील, दीपक साळुंखे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी याबाबतचा लेखी आदेश लवकर न निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. आता लेखी आदेश निघाल्याने बबनदादांना आमदारकीचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही.

उजनीतून इंदापूरला पाणी वळवण्यास सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. विविध शेतकरी संघटनांनी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलनही केले होते. भारतीय जनता पक्षाबरोबरच महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनीही विरोध दर्शवला होता. या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात एकाकी पडल्याचे चित्र होते. विशेषतः इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूरचे पालकमंत्री असलेले दत्तात्रेय भरणे यांच्याविषयी जिल्ह्यात असंतोष वाढत चालला होता. त्यांना इंदापूर आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी भूमिका वठवावी लागत होती. 

सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर आंदोलक शेतकऱ्यांचे समाधान झाले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत हे पाणी रद्द झाल्याचा शासकीय अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या गोविंद बागेसमोरही बुधवारी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

त्यानुसार उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या दारात आंदोलनाला बसले होते. उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर येथील मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते. या वेळी पोलिसांनी कारखान्यावर आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या आंदोलनाची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द केला. त्यानंतर आंदोलकांकडून हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.. 

दरम्यान, जलसंपदा विभागाने आज (ता. २७ मे) उजनी धरणातून इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी रद्द करत सल्याचा लेखी आदेश काढला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाचे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलक  आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com