आमदार भारत भालके यांचे निधन 

आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता.
Pandharpur-Mangalvedha MLA Bharat Bhalke passes away
Pandharpur-Mangalvedha MLA Bharat Bhalke passes away

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, तीन विवाहित मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. त्यापूर्वी दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रूबी हॉस्पिटलमध्ये जावून तेथील डाॅक्टरांकडे आमदार भालकेंच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डाॅक्टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातदेखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे उपचारासाठी रूबी हाॅस्पीटलमध्ये दाखल केले होते.  गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची शुक्रवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास वाढल्याने आज दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक  होती.
 

राजकीय पार्श्वभूमी

भारत भालके यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभेची निवडणूक लढवली होती.  माजी आमदार सुधाकर परिचारक आणि राजूबापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी लढत देत तब्बल 40 हजारांहून अधिक मते घेतली होती. तिरंगी लढतीत परिचारक यांनी बाजी मारली होती. त्यानंतर 2009 मध्ये भालके यांनी रिडालोसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याचा पराभव करत ‘जायंट किलर’ म्हणून पहिल्यांदाच राज्याला ते  परिचित झाले. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. भाजप आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत बागल यांचा त्यांनी पराभव केला होता.

राज्यात 2019 मध्ये भाजप शिवसेनेची लाट असतानाही त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. या निवडणूकीमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचे तगडे आव्हान समोर असतानादेखील भालके यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर परिचारकांचा सुमारे 14 हजाराहून अधिक मताधिक्यांनी पराभव करत विजयाची हॅट्रट्रीक केली .

तालुक्याच्या राजकारणात 1992 पासून सक्रीय 
पहिलवान असलेले आमदार भारत भालके हे थेट 1992 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आले. संचालकाच्या रुपाने त्यांनी थेट तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. अवघ्या काही दिवसातच त्यांनी औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासावर त्यांना कारखान्याचे उपाध्यक्षपदही मिळाले.

दरम्यानच्या काळात वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात राजकीय दुही निर्माण झाली होती. या मध्ये  आमदार भारत भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरवात केली. काळे यांच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांनी 2002 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले. जो विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष तो तालुक्याचा आमदार अशी म्हणच त्यावेळी तालुक्यात रुढ झाली होती.

आमदार भालकेंनी 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी  विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारुन पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. कामाच्या जोरावर आणि दांडग्या लोकसंपर्कामुळे त्यांनी 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. त्यावेळी त्यांना मुंबईला नेण्यासाठी काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी खास हेलिकाॅप्टर पाठवले होते.


कोल्हापूरच्या लालमातीत मिळाले राजकीय धडे 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे 1960 मध्ये त्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण  सरकोली येथील प्राथमिक शाळेत  झाले.  द. ह. कवठेकर प्रशालेत त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले. शिक्षणाबरोबरच पहिलवानकी करण्यासाठी ते कोल्हापूर येथे गेले.  कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत पहिलवानकीचा सराव सुरु केला. तिथेच त्यांना राजकारण आणि समाजकारणाची आवड निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता.

कोल्हापूरच्या तालमीतून आल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणाला सुरवात केली. माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंढरपूर तालुक्यात जनसेवा संघटनेचे काम सुरु केले. पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळवून देण्यात प्रतापसिंहांचा मोठा वाटा होता.

सलग 18 वर्षे 'विठ्ठल'च्या अध्यक्षपदाची धुरा  


वसंतराव काळे यांच्या निधनानंतर 2002 मध्ये आमदार भारत भालकेंची गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. गेल्या अठरा वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून काम पहात होते. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याच्या विस्तारीकरणा बरोबरोरच को-जन,डिस्टिलरी आणि इथेनाॅल निर्मिती प्रकल्प सुरू झाले. फक्त जमिन तुमची खत,बेणे आणि ड्रीप कारखान्याचे अशी सभासदांसाठी राबवलेली  अभिनव योजना त्याकाळी  खूप चर्चेची ठरली होती.


आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत

अलीकडेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज होती. राज्य सरकारची  थकहमी मिळत नसल्याने आर्थिक कोंडी झाली होती.  बॅकांच्या आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार कारखान्याला थकहमी मिळणे अशक्य होते. तरीही आमदार भालके यांनी शरद पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सरकारकडून थकहमी मिळवून घेतली. राज्य सरकारलादेखील आपल्या नियमात बदल करणे भाग पडले. त्यानंतर राज्यातील सुमारे 21 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी मिळाली. त्यानंतर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com