मंगळवेढा (जि. सोलापूर) ः बहुमताच्या जोरावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. अर्थमंत्री म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची जबाबदारी माझी आहे, त्यासाठी आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी विधानसभेत जाणे आवश्यक आहे, असे सांगून भगिरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज मुढवी, बोराळे, हुलजंती, भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहीवडी या गावांचा दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात विरोधी भारतीय जनता पक्षाकडून प्रचारासाठी पराभूत झालेले नेते येऊन उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला करीत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले की, पवारसाहेब आणि मी अडचणीत असलेल्या साखर कारखान्याला मदती करण्याचे काम केले आहे. मात्र, मागील सरकारने अडचणीतल्या कारखानदारांना मदतीच्या मोबदल्यात आपल्या पक्ष प्रवेश करावयास लावला. नाहीतर ते वेगवेगळ्या चौकशी लावायचे. असले उद्योग आम्ही कधीही केले नाहीत.
धनंजय मुंडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असताना विविध मंत्र्यांची 22 प्रकरणे बाहेर काढली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्या सगळ्यांना क्लीनचिट दिली. चौकशी करण्याबद्दल आपले काही दुमत नाही. मात्र, एखादा माणूस आपल्याला डोईजड होतोय; म्हणून त्याचे राजकारण संपवून टाकणे, हे योग्य नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
‘अजित पवारांनी काही साखर कारखाने घेतले आहेत, आता तुमचाही कारखाना घ्यायला निघालेत,’ असा आरोप करणाऱ्या माजी मंत्री राम शिंदे यांचा समाचार घेताना पवार म्हणाले की, मी पुढाकार घेऊन तो कारखाना चालवला. ज्याच्यात धमक आहे, ते कारखाना चालवू शकतात. विरोधी उमेदवाराने 19,500 शेतकरी सभासद व क्रियाशील करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अडचणीच्या काळात एखाद्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन केले नाही; म्हणून त्याचे सभासदत्व रद्द करायचे, हा कुठला प्रकार. बारामतीच्या जनतेत आम्ही काम केल्यामुळे आम्हाला झेपेल, त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य देतात, त्यांच्या ओझाने आम्ही वाकून जातो. पण, समोरच्याचे डिपाॅझीट देखील जप्त करून टाकतात. निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर शेवटच्या प्रचारसभेलाच आम्ही जातो.
ते म्हणाले, पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भगीरथ भालकेना संधी द्यावी. मीच वाढप्या आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न मार्गी लागतील. जर कुठे अडचण आली, तर मी जलसंपदा जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सांगेन की प्रचारात मी त्यांना शब्द दिलाय म्हणून.
सहकार खाते सोलापूरचे सुभाष देशमुख यांच्याकडेच होते. मात्र, त्यांनी केवळ राजकारण केले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीत असताना त्यांनी मदत केली नाही, असा आरोपही अजित पवार यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.