...तर रक्तरंजित आंदोलन होईल : शिवसेना आमदाराचा स्वपक्षाच्या सरकारलाच इशारा 

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात तरी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
If Ujani water is taken to Indapur, there will be a bloody agitation in Solapur district : MLA Shahaji Patil
If Ujani water is taken to Indapur, there will be a bloody agitation in Solapur district : MLA Shahaji Patil

पंढरपूर : उजनी धरणातील  (Ujani Dam) पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी देण्यास ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर (sharad pawar) टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला (Indapur) नेले, तर सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले  जाईल, असा इशारा राज्यातील ठाकरे सरकारला दिला आहे.  (If Ujani water is taken to Indapur, there will be a bloody agitation in Solapur district : MLA Shahaji Patil)

उजनी धरणातील पाण्यावरून सोलापूरचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. याच कळीच्या मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पवार यांच्यावर उजनीच्या पाण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडत सरकारला घरचा आहेर दिला. उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात तरी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यास उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.  

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूद येथील निवासस्थानासमोर आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. या वेळी पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. 

या वेळी  आमदार पाटील म्हणाले की, उजनीचे पाणी इंदापूरला मंजूर करताना सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला विश्वासात घेतले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आघाडी सरकारने अन्याय केला आहे. अशा पद्धतीचा सरकारने निर्णय घेतला तर आम्ही रक्तरंजित लढाई करू, असा इशारा आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीला सरकारला  दिला आहे.

राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले, तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला वळवून न्यायचा  आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे, असं सगळया देशभर सांगत फिरायचं, ही पवारांची राजकीय पद्धत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला. मात्र, पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

शरद पवार यांनी उजनी धरणातून बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि  सिनर्मास प्रकल्पास पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची  काय यंत्रणा असती, तर ते धरणसुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं, अशी जोरदार टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. दरम्यान, येत्या काळात उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com