उरुळी कांचन (जि. पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत मागील काही वर्षांपासून काही गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. पुणे शहराप्रमाणेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचीही कुंडली तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे यापुढील काळात पूर्व हवेलीत गुंडाची नव्हे; तर हवा फक्त पोलिसांचीच राहणार आहे, असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याबरोबरच, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीत महामार्गावर उभ्या करणाऱ्या वाहन मालकांना पोलिसी कारवाईला सामोरी जावे लागणार आहे, असे गुप्ता यांनी या वेळी स्पष्ठ केले.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते लोणी काळभोर पोलिसांच्या बीट मार्शल (२४ तास पोलिस मदत सेवा) युनिटच्या सेवेचा शुभारंभ उरुळी कांचन पोलिस चौकीच्या आवारात मंगळवारी (ता. १३ एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी पार पडला. त्यावेळी गुप्ता यांनी वरील इशारा दिला.
या वेळी हडपसर परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण विधाते, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे, उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, मावळते ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, उपसरपंच संकिता कांचन, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष कांचन आदी उपस्थित होते.
पुण्यात समावेश झाल्याचा परिणाम काही दिवसांत दिसेल
आयुक्त गुप्ता म्हणाले, पुणे शहर पोलिसात सामविष्ठ झाल्यापासून आजपर्यंत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मंजूर संख्याबळाच्या ५० टक्के स्टाफची नेमणूक झाली आहे. उर्वरीत पोलिस बळ सहा महिन्यांत टप्या टप्याटप्याने पाठविले जाणार आहे. लोणी काळभोर पोलिसांत शहराप्रमाणे प्रत्येक विभागानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शहरातील नागरीकांप्रमाणेच लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीतील नागरीकांना तत्पर सेवेसह सामान्यांना आश्वासक अशी पोलिस सेवा देण्यावर भर दिला आहे. शहर पोलिस दलात सामावेशाचे निश्चित परिणामकारक चित्र पुढील काही दिवसात या भागातील नागरीकांना पहायला मिळणार आहे. नागरीकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यास पोलिसांची प्राथमिकता असणार आहे.
पोलिसांची हवा काय असते, ते दाखवून देऊ
लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन पोलिस ठाणी ग्रामीण पोलिस दलातून नुकतीच शहर पोलिस दलात सामाविष्ठ झाली आहेत. या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी, वाहतूक नियंत्रण, अर्थिक व सायबर गुन्हेगारी यांचा स्वतंत्र अभ्यास चालू आहे. याबाबतची माहिती संकलीत होताच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन, यापुढील काळात लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत पोलिसांची हवा काय असते, ते दाखवून देऊ, असा परखड इशारा पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांना दिला.
पोलिस ठाण्यात २० गुंठे जागा देणार
या वेळी उरुळी कांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्रासाठी ग्रामपंचायत हद्दीत २० गुंठे जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त गुप्ता यांना दिले.
उरुळी कांचन पोलिस ठाण्याबाबत सस्पेन्स कायम
अमिताभ गुप्ता म्हणाले, उरुळी कांचन शहरासाठी स्वतंत्र पोलिश ठाणे व्हावे, यासाठी यापूर्वीच सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन, उरुळी कांचनसाठी स्वंचत्र पोलिस ठाणे तयार होणार आहे. मात्र, नवीन पोलिस ठाणे अस्तित्वात आणण्यासाठी सरकारला ८ कोटी रुपये खर्च करावा लागतात. तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला किमान १० महिन्यांची वेळ अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाची लाट पहाता हा कालावधी आणखी वाढू शकतो. उरुळी कांचन पोलिस ठाणे झाल्यास ते ग्रामीण पोलिसात राहणार आहे. मात्र, ते नेमके कधी होणार, याबाबत मात्र बोलण्यास गुप्ता यांनी नकार दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.