पिंपरी : मुंबईतील निर्भयाकांडाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सोमवारी (ता.१३) पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) या गुन्ह्यातील आरोपीच्या प्रतिमेला भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. यावेळी राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला जाग कधी येणार असा सवाल विचारला गेला. आठवड्यात चार बलात्कार झाल्याच्या घटनेकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. (BJP workers protest against Thackeray government)
हाथरस घटनेनंतर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. आता त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का? असा प्रश्न युवा मोर्चाने या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला. तसेच, महाराष्ट्रातील शक्ती कायदा हा फक्त कागदावर आहे की अंमलात आणणार आहात असा जाबही विचारण्यात आला. बलात्कारासारख्या केस ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून त्यातील नराधमांना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा करावी, अशी मागणी भाजयुमोने यावेळी केली. पूजा आल्हाट, प्रियांका शाह, तेजस्विनी कदम, प्रियांका देशमुख, आरती ओव्हाळ यांच्या पुढाकारात हे आंदोलन झाले. त्यात युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, युवती संयोजिका सोनम गोसावी, सोनम जांभुळकर, अर्पिता कुलकर्णी, शुभांगी कसबे, ज्योती खांडरे, सारिका माळी आदी सामील झाले होते.
राज्यात आठवडाभरात पुणे, मुंबई, अमरावती सारख्या शहरात लहान मुली व महिलांवर अमानवीय प्रकारे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. साकीनाका घटनेतील तरुणीवर, तर अत्यंत घृणास्पद अत्याचार करून मारण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमाला फाशीची कठोर शिक्षा होऊन पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा. तसेच काही दिवसांपासून महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढत होत आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आघाडी सरकारने कडक पावले उचलून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी पूजा आल्हाट यांनी केली.
तर, निर्भया कायदा हा फक्त कागदावर राहिला आहे का अशी विचारणा युवा सरचिटणीस तेजस्वी कदम यांनी केली. दिल्ली निर्भया प्रकरणात आरोपींना २०१३ ला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. मात्र, उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात अपिल आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दया याचिका यामुळे शिक्षेला सात वर्षे विलंब झाला. मुंबईतील निर्भया केसमध्ये तसे होऊ नये. त्यासाठी कायद्यातील पळवाटा बंद झाल्या पाहिजेत. मुंबईतील निर्भयाकांडातील आरोपीला २१ दिवसांत फाशी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. अशा घटनेत आरोपीचा चौरंग्या करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात बलात्कार वाढल्याबद्दल भाजयुमोच्या सोशल मिडियाच्या सहसंयोजिका प्रियंका देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. या गुन्ह्यांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी हात तोडून व तळमळीने सरकारकडे करताना त्यांना अश्रू आवरले नाही.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.