आयुक्तांचे नांव घेत खासदार बारणेंचा भाजपवर निशाणा

आयुक्तांचा कारभारावर वचक राहिला नसून ते पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करीत आहेत,असा हल्लाबोल बारणे यांनी केला.आयुक्तांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. पालिका अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे,असे ते म्हणाले
Shravan Hardikar- Shrirang Barane
Shravan Hardikar- Shrirang Barane

पिंपरी : एफडीआर घोटाळ्यात ठेकेदार हे छोटे मासे असून खरे दोषी हे पालिका प्रशासन आणि पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हेच असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केला. कारण आयुक्तांनीच या घोटाळ्याला बगल दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्तांचा कारभारावर वचक राहिला नसून ते पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करीत आहेत,असा हल्लाबोल बारणे यांनी केला.आयुक्तांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. पालिका अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे,असे ते म्हणाले.राज्यात शिवसेना सत्तेत आहे,मग आयुक्तांच्या बदलीची तुम्ही मागणी का करीत नाही,असा प्रश्न विचारला असता आय़ुक्तांची बदली करावी, या विचाराचा मी नाही. कारण त्यांच्या बदलीने पालिका कारभारात सुधारणा होईल,असे मी मानत नाही,असे बारणे म्हणाले.

एफडीआर घोटाळ्याप्रकरणी पालिकेने आपल्या पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंदवल्याची पहिली बातमी सरकारनामाने  दिली.या घोटाळ्यात पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय त्यात व्यक्त करण्यात आला होता.त्याची बारणेंनी लगेच दखल घेत पत्रकारपरिषद घेतली. त्यात या घोटाळ्यात पालिकेतील अधिकारी व थेट आयुक्तच सहभागी असल्याचा आरोप करीत सरकारनामाच्या बातमीला त्यांनी पुष्टी दिली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे,शहरप्रमुख योगेश बाबर,शहर महिला संघटिका ऊर्मिला काळभोर यावेळी उपस्थित होते, बारणे म्हणाले, ''आयुक्त हर्डीकरच एफडीआर घोटाळ्याला जबाबदार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच भ्रष्टाचार बोकाळला आहे.त्याला पाठिंबा देणारे आयुक्त खरे दोषी आहेत. पालिकेचे अधिकारीच घोटाळा करणाऱ्या ठेकेदारांचे पार्टनर झालेले आहेत. त्याचे दुष्परिणाम हे शहराला भविष्यात भोगावे लागणार आहेत. तसेच त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे जनतेच्या कररुपी पैशाचा चुराडाही होत आहे, ते वेगळेच.निविदा संगनमत करून भरल्या जात असून ठराविक ठेकेदारांनाच पुन्हा पुन्हा कामे दिली जात आहेत. पवना बंद जलवाहिनीची अशीच चुकीच्या पद्धतीने निविदा काढली गेल्याने तो प्रकल्प गेली कित्येक वर्षे रखडला आहे.भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्याची योजनाही त्याच मार्गावर आहे.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com