पिंपरी : "आपण राज्यात सत्तेत आहोत. तरीही हे औटघटकेचे राजे आहेत, असे अनेक ठिकाणी प्रशासनाला वाटते आहे. असं समजणाऱ्या भाजपधार्जिण्या प्रशासनाला बेजार करून सोडा,'' असे आवाहन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसैनिकांना केले. "गटबाजीमुळे वाटोळे झाल्याने ती गाडून काम करा,'' असे कानही त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे टोचले.
शिवसेनेचा जन्म लढ्यातून झाला असल्याने प्रशासन शिवसेनेला चळाचळा कापायचे, अशी आठवणही मिर्लेकर यांनी सांगितली. आता केवळ लढायचे नाही, तर जिंकायचे आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी जनतेचा आधारवड व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या मिशन 2022 अंतर्गत शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा शनिवारी (ता. 31 जानेवारी) शाहुनगर येथे मेळावा झाला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते.
ते म्हणाले, "शिवसैनिकांचा फक्त एकच गट, तो म्हणजे बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा गट होय. नेतृत्वाशी आपली बांधीलकी असली पाहिजे. मात्र, गटबाजीमुळे आपले उमेदवार पडले. ज्या भागातून सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला मिळायचे, तेथे मताधिक्य एकदम कमी झाले. हे सर्व गटबाजीचे परिणाम आहेत.''
मेळाव्याच्या फलकावर शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांचा फोटो नव्हता. त्यावरून मिर्लेकर यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना मेळाव्याच्या फलकावर शहरप्रमुखांचा फोटो नाही, असे का व्हावे. यातूनच गटबाजी दिसून येते. येत्या महापालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर हे चित्र बदलायला हवे. सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे. गटबाजी, मतभेद मोडीत काढा, असेही ते म्हणाले.

