पिंपरी : कामशेत या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील भाजपची सत्ता जाऊन तेथे महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. दरम्यान, भाजपचा मावळ हा बालेकिल्ला महाविकास आघाडीने उध्वस्त करीत ५७ पैकी ४५ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तर, मावळचा गड शाबूत राखत उलट गेल्यावेळपेक्षा जास्त म्हणजे ३५ ग्रामपंचायतीत भाजप आणि आऱपीआय युतीचा विजय झाल्याचा प्रतिदावा माजी मंत्री आणि भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी सरकारनामाशी बोलताना केला.
मावळातील ५७ पैकी आठ ग्रामपंचायती बिनिविरोध झाल्याने ४९ ठिकाणी मतदान झाले.शेळके यांनी विधानसभेला मावळ हा भाजपचा बालेकिल्ला सव्वा वर्षापूर्वी उध्वस्त केला. त्यानंतर झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीतही मविआच विजयी झाल्याचा दावा त्यांनी निकालानंतर माध्यमांशी बोलताना केला.मविआ सरकारच्या कामामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ८० टक्के ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून तेथे पूर्वी भाजपची सत्ता होती,अशी माहिती त्यांनी दिली.
तर, मावळातील जनतेने भाजप,आऱपीआय युतीला कौल दिला असून ४८२ पैकी २७२ ग्रामपंचायत सदस्य हे भाजपचे निवडून आले असल्याचा दावा भेगडे यांनी केला आहे.बिनविरोध झालेल्या आठपैकी चार मिळून एकूण ३५ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला. गहूंजे, नवलाख उंबरेसारख्या ठिकाणी नव्याने सत्ता येऊन या आणखी काही गावांतही सत्ता आल्याचे त्यांनी सांगितले. फक्त कामशेत हातातून निसटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गतवेळी २३ ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. यावेळी हा आकडा ३५ झाल्याने भाजपच्या यशाची कमान वाढतीच असल्याचे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.