मिरा-भाईंदर भाजपमध्ये भूकंप : महापौरांसह ४० नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा 

पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे.
BJP controversy over Mira Bhayander city president post; Warning of resignation of 40 corporators including the mayor
BJP controversy over Mira Bhayander city president post; Warning of resignation of 40 corporators including the mayor

भाईंदर : भारतीय जनता पक्षाच्या मिरा-भाईंदर शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. या निवडीविरोधात महापौर, उपमहापौरांसह भाजपच्या सुमारे ४० नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा प्रदेश नेतृत्वाला दिला असल्याने मिरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. (BJP controversy over Mira Bhayander city president post; Warning of resignation of 40 corporators including the mayor)

भाजपच्या मिरा-भाईंदर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पत्र सोमवारी (ता. २२ जून) सायंकाळी समाजमाध्यमांवर पसरले. यावरून भाजपमधील माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा गट संतप्त झाला आहे.

मंगळवारी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर, भाजपचे नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची भेट घेण्यास गेले होते. परंतु ते दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट झाली नाही. मात्र, भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची नियुक्ती करताना स्थानिक पदाधिकाऱ्यां‍शी चर्चा करण्यात आली नाही, अशी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार असल्याची माहिती भांडारी यांना देण्यात आली. या वेळी भाजपच्या ६१ नगरसेवकांपैकी सुमारे ४० नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यां‍च्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

येत्या २४ जूनला होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन भांडारी यांनी दिले. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली आहे. यासंदर्भात २४ तारखेला सकारात्मक निर्णय झाला नाही, तर मिरा-भाईंदरमध्ये वेगळे चित्र दिसेल, अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली. 

यासंदर्भात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांच्याशी संपर्क साधला असता, आपण पक्षाने दिलेल्या आदेशानुसार काम करत आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया व्यास यांनी दिली.
 
मेहता गटासोबत केवळ २४ नगरसेवक

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी पक्षातच वेगळा गट केला आहे. मावळते जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे या गटाचे नेतृत्व करत होते. हेमंत म्हात्रे यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्यावर या पदासाठी पक्षात चुरस निर्माण झाली होती. मेहता गटदेखील या पदासाठी इच्छुक होता. रवी व्यास यांची नियुक्तीच्या पत्रामुळे मेहता गटाला हादरा बसला आहे. दुसरीकडे निवेदनावर ४० नगरसेवकांच्या सह्या असल्या, तरी प्रत्यक्षात मेहता गटासोबत २२ ते २४ नगरसेवकच आहेत आणि हे केवळ दबावतंत्र आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com