ग्रामदक्षता समित्याच कोरोनाग्रस्त; कसे होणार नियंत्रण?

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामदक्षता समित्या आणि ग्रामरक्षक दल कागदावरच असल्याने जबाबदारी पार पाडत आहेत का?, याबाबत शंका आहे.
Covid19
Covid19

तळोदा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामदक्षता समित्या आणि ग्रामरक्षक दल कागदावरच असल्याने जबाबदारी पार पाडत आहेत का?, याबाबत शंका आहे. या समित्यांच्या अनेक सदस्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त समित्या ग्रामस्थांत काय व कशी जागरूकता निर्माण करणार हा चर्चेचा विषय आहे. 

समित्यातील सदस्य किंवा त्यांच्या संपर्कातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने यांच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तळोदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. तालुक्यातील खेडले, बोरद, रांझणी, राणीपुर, आमलाड, चिनोदा, प्रतापपुर या गावांसह दुर्गम भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तळोदा तालुक्यात गावनिहाय कोरोना ग्राम दक्षता समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. यात सरपंच, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार, ग्रामसेवक आदींचा समावेश होता. तसेच 'माझे गाव माजी जबाबदारी' या घोषवाक्यासह प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये देखील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलिस पाटील, कोतवाल, मुख्याध्यापक, तलाठी तसेच आवश्यकता भासल्यास माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, एनसीसीचे छात्र, गावातील युवकांचा समावेश करण्याच्या सूचना होत्या.

प्रशासनाच्या सुचनेनुसार आदेशानुसार गावनिहाय ग्राम दक्षता समिती व ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. या समित्यांना नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्यांना तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास सांगणे, इतर जिल्ह्यातून कोणी नागरिक आल्यास त्यास चौदा दिवस विलगीकरण करणे, नागरिकांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याबाबत जनजागृती, पॉझिटिव्ह व्यक्तींवर लक्ष ठेवणे, संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण आदी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या होत्या. मात्र अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. हे  पाहता समित्या व ग्रामरक्षक दल केवळ कागदावरच आहेत. त्या स्वतःच कोरोनाग्रस्त झाल्याने नव्याने ही यंत्रणा कार्यरत करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

समिती सदस्यच पॉझिटिव्ह 
ग्राम दक्षता समिती व ग्रामरक्षक दलातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील व्यक्तींना कोरोना झाल्याने या सदस्यांच्या पर्यायाने या समित्यांच्या कामकाजावर मर्यादा आल्याचे सांगितले जाते. या समित्यांमध्ये इतरांचा समावेश करता येईल का? याचा विचार आवश्यक आहे.
...  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com