ICU ला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपचा काॅक कुणीतरी बंद केला आणि नाशिकमध्ये मृत्युने तांडव मांडले....

महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन कोवि़ड रुग्णालयाची ऑक्सीजनच्या टाकीला गळती लागली. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा बंद झाला. त्यात व्हेंटीलेटरचा उपचार घेणारे बावीस रुग्ण दगावले, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
Zakir
Zakir

नाशिक : महापालिकेच्या डॅा. झाकीर हुसेन कोवि़ड रुग्णालयाची ऑक्सीजनच्या टाकीला गळती लागली. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा बंद झाला. त्यात व्हेंटीलेटरचा उपचार घेणारे बावीस रुग्ण दगावले, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

या रुग्णालयात दिडशेहून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यात तेवीस रुग्ण लाईफ सपोर्टीव्ह (व्हेंटीलेटर) उपचारावर होते. सकाळी अकराला रुग्णालयाच्या केंद्रीत ऑक्सीजन पुरवठ्यासाठी बसविलेल्या टाकीत ऑक्सीजन रिफीलींग करण्यासाठी ड्युरो टॅंक आला होता. फिलींगच्या कॅाकला पाईप जोडल्यानंतर प्रेशर कॅाक सुरु करण्यात आला. यावेळी टाकीला व टॅंकरच्या पाईपला कनेक्ट करणारा व्हॅाल्वचे थ्रेड व्यवस्थित नव्हते. थ्रेड ढिले असल्याने ऑक्सीजनच्या उच्च दाबामुळे पाईप नीट कनेक्ट न झाल्याने टाकीत न जाता बाहेर पसरला. फिलींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गोंधळामुळे ही त्रुटी झाली असावी, असा कयास आहे. 

दरम्यान रिफीलींगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मते रिफीलींगची टाकी आली त्याआधीच ऑक्सीजनची गळती होत होती. ती दुरूस्त  करम्यासाठी तंत्रज्ञांनी टाकी असलेल्या बंदीस्त भागाच्या जाळीचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या मते त्यची दुरुस्ती केली होती. त्यानंतर रिफीलींग करताना गळती झाल्याने काय करावे या गोंधळात कोणीतरी टाकीतून रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला होणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा बंद केला. हा पुरवठा बंद झाला आहे, हे अनेकांच्या लक्षातच आले नाही. जवळपास दिड तास प्राणवायू बंद असल्याने व्हेंटींलेटरच्या कृत्रीम प्राणवायूवर (लाईप सेव्हींग सिस्टीम्स) असलेल्या रुग्णांचा ऑक्सीजन बंद झाला. त्यात श्वास कोंडून ते अत्यावस्थ झाले. यावेळी एकतीस रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. यातील बावीस रुग्णांचा मृत्यू झाला. प्राणवायू घेत असलेल्या अन्य रुग्णांची प्रकृती देखील खालावली.अन्य 161 रुग्ण येथे दाखल होते असे सांगण्यात आले. यादरम्यान रुग्णालयात विस्कळीतपणा निर्माण झाला. त्यात सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यात रुग्णांचे नातेवाईक देखील होते. या सर्व धावपळीत अनुभवी डॅाक्टर्स, पिरचारीका, रुग्ण या सगळ्यांचाच  गोंधळ झाला. त्या दरम्यान बावीस रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, खासदार हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या घटनेची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने रुग्णालयास भेट दिली. या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. रुग्णांच्या मृतांविषयी त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. 

या सर्व प्रकरणात तांत्रीक चुक व रुग्णांच्या नातेवाईकाचा गोंधळ यात दुर्देवी प्रकरणात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या बावीस रुग्णांना मात्र आपले प्राण गमवावे लागले. या विषयाच्या भावनीक व प्रशासकीय गोंधळात महापौर हे या यंत्रणेचे प्रमुख असतात. लोकप्रतिनिधी म्हणून शहराचे हे प्रथम नागरिक मात्र कुठेही दिसले नाहीत. महापालिका आयुक्त लोकांपासूनच नव्हे तर प्रशासनातील अधिकाऱ्यांपासूनही दूरच होते.या टाकीची गळती आधीपासून सुरु होती असे सांगम्यात आले. त्यामुळे याआधीच या रुग्णालयाच्या त्रुटींबाबत लक्ष घातले असते, तर कदाचीत या त्रुटी टाळता आल्या असत्या. महापालिका पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, शहरातील स्थितीकडे लक्ष घालावे अशी मागणी व दबाव गेले महिनाभर शहरात होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. मुळ तांत्रीक बाबीसह मुख्य विषयाची चर्चा न होता भावनिक विषयाचा गोधळ अधिक होता. तो कधी निवळणार याची प्रतिक्षा आहे. बावीस रुग्णांच्या कुटुंबियांवर झालेल्या आघातातून त्यांना धीर देण्याची गरज या सगळ्यांत जास्त प्राधान्याची आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शोकमग्न आहे!

“ कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!”  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृताच्या कुटुंबियांना पाच लाखाच्या मदतीची घोषणा त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com