मराठा आरक्षण; नेते म्हणाले, `मूळ प्रश्‍नाला सरकारकडून बगल`

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविल्यानंतर राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतर्गत शैक्षणिक आणि राज्य शासनांतर्गत येणाऱ्या काही नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रकार आहे. सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले, अशी प्रक्रीया येथील नेत्यांनी व्यक्त केली आहे.
Maratha nsk
Maratha nsk

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द (SC Rejects maratha reservation) ठरविल्यानंतर राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतर्गत (State government given EWS quota reservation) शैक्षणिक आणि राज्य शासनांतर्गत येणाऱ्या काही नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रकार आहे. (This decision means avoide main issue) सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले, अशी प्रक्रीया येथील नेत्यांनी व्यक्त केली आहे. 

राज्य शासनाने मराठा समाजाला सरळ सेवा भरतीत १० टक्के आरक्षण लागू केले जाते. त्या वर्गवारीत मराठा समाजाचा समावेश केला आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकात आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला असला, तरी मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकांना शासन निर्णय मान्य नाही. मराठा समाजाची दिशाभूल करणारा हा निर्णय असून, मूळ प्रश्‍नाला बगल देताना समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या.

तात्पुरती मलमपट्टी नको : गायकर
मुळात मराठा क्रांती मोर्चाने ईडब्ल्यूएससाठी सरकारकडे मागणी केली नव्हती. भविष्यात आरक्षण मिळाल्यास ईडब्ल्यूएसचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा कुठलाच लाभ मिळणार नाही. ईडब्ल्यूएसमध्ये खुल्या प्रवर्गातील इतर राज्यांतून आलेले लोक दावा करतील. त्यामुळे मराठा समाजाला दीड ते दोन टक्के लाभ मिळेल. राज्य सरकारने घोषित केलेले आरक्षण दिशाभूल करणारे आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी घातक आहे. मराठा आरक्षणात तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी तोडगा हवा, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी सांगितले. 

सरकारने पळवाट काढली : ॲड. सहाणे
`ईडब्ल्यूएस`मध्ये शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यात पळवाट काढली आहे. पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन नसावी, ग्रामीण भागात शंभर फुटांपेक्षा अधिक घर नसावे, या अटींमुळे लाभ मिळू शकत नाही. ईडब्ल्यूएसचा लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व पुढे आरक्षण मिळाल्यास पुन्हा एसईबीसीमध्ये समाविष्ट होता येणार नाही. राज्य शासनाने गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पुन्हा नवीन अहवाल सादर करावा. राज्यपालांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवावा. राष्ट्रपतींनी अहवाल संसदेत सादर करून मंजूर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक  ॲड. शिवाजी सहाणे यांनी केली.

तात्पुरता देखावा : राजू देसले
`ईडब्ल्यूएस` केंद्र सरकारचे आरक्षण आहे. ते देत असताना यापूर्वी मराठा समाजाला का वगळले, याचे उत्तर आधी द्यावे लागेल. आता ईडब्ल्यूएस आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिले जात असेल, तर ती पळवाट असून, तीही तात्पुरती आहे. केंद्राचे ५० टक्क्यांचे आरक्षण नाकारल्याने सर्वोच्च न्यायालयात ईडब्ल्यूएससंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्यामुळे शासनाने मूळ प्रश्‍नाला बगल देण्यापेक्षा मराठा आरक्षण देण्यासाठी कायदेशीर कारवाई जलदगतीने करावी. ईडब्ल्यूएस आरक्षण देऊन दिशाभूल करू नये. मूळ प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी सांगितले. 

जखमेवर मीठ चोळले : कदम
वास्तविक केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण लागू केले आहे. राज्य सरकार त्यात फेरबदल करू शकत नाही. राज्य सरकार आरक्षण देत असल्याचे सांगत असले, तरी त्यात जाचक अटी आहेत. त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध आहे. जाचक अटी रद्द होत असतील, तर समाजाला उपयोगी आहे. त्यात खुल्या वर्गातील सर्वच घटक समाविष्ट असल्याने मराठा समाजाचा त्याला विरोध आहे. राज्य सरकारने समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. छत्रपती संभाजीराजे जी भूमिका घेतील तीच यापुढे कायम राहील, असे छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम म्हणाले. 
---
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com