जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आज सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात लॅाकडाऊन आहे. या लॅाकडाऊनही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. भाजपनेही व्यापाऱ्यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच कडक निर्बंधानांही भाजपने विरोध केला आहे. त्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.
कोरोना वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन हा पर्याय असल्याचे सांगत पाटील म्हणाले, भाजप त्याला विरोध करीत असला तरी कोरोना पक्ष पाहून होत नाही. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. आमदारांना लॉक डाऊन पाहिजे, असा समज जनेतेने करून घेतला आहे. आमचाही लॅाकडाऊनला विरोधच आहे. पण त्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाला रोखण्यासाठी हा पर्याय स्वीकारला नाही तर जनता माफ करणार नाही.
भाजपच्या विरोधाबाबत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना हा भाजप, शिवसेना असं पाहून होत नाही तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे येथे पक्षीय प्रश्न नाही तर जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे उगाच विरोध करणे योग्य नाही. व्यापाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न असल्याने त्यांचा विरोध योग्य आहे. पण आता जीवनही महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत सरकारही आपल्या ठिकाणी योग्य निर्णय घेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.
तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही...
व्यावसायिक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत, हे खरे आहे. रोजच्या जगण्याचा त्यांचा विचार केला तर त्यांची भूमिका योग्य वाटते. पण परिस्थिती तशी नाहीये. आपले राज्य आता कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तुटणार नाही, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले.
काही व्यापाऱ्यांनी सांगितले की तुम्ही काहीही करा, पण सोमवारपासून आम्ही दुकान सुरू करू. पण तसे केल्यास धोका वाढेल. आज झालेल्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले की तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तोडता येणार नाही. त्यावर ही साखळी तोडण्यासाठी एकदा काय तो निर्णय आपण घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनासुद्धा यासंदर्भातील बैठकीला बोलावण्यात येणार आहे. उद्या झुम कॉलवर मुख्यमंत्री ही बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.
तीन आठवड्यांचे कडक लॉकडाऊन केल्यानंतर भाजीपाला जरी घ्यायचा असेल तर तो मोठ्या मैदानात सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून घ्यावा लागेल. किराणा दुकानात कुणाला जाता येणार नाही, तर फोनवर ऑर्डर करून घरपोच किराणा मालाचा पुरवठा दुकानदारांना करावा लागेल. हे सर्व शक्य होईल का यावर उद्याच्या बैठकीच चर्चा होणार आहे. त्यानंतर लशींचा तुटवडा, रेमडेसिव्हरचा तुटवडा आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कमी पुरवठा होत आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.