धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जत्रेचे स्वरूप येत आहे. येथे संचारबंदी आहे की नाही किंवा काळजी घेतली जाते किंवा नाही, असे अनेक प्रश्न पडले आहेत. नागरिकांना पोलिस, कायद्याचा धाक का दिसत नाही, "कोरोना'बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सुयोग्य धोरण निश्चित करू शकली नाही, असे अनेक गंभीर प्रश्न, असे प्रकार धुळे जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे.
"टीम वर्क'चा अभाव दिसण्याची कारणे काय? यातून घडणाऱ्या विविध प्रकारांमुळे जिल्ह्यात असे का घडतेय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारी रुग्णालयातून "कोरोना'बाधित किंवा संशयित पळाला... काही सरकारी डॉक्टर कामावर येत नाहीत, रजेवर जातात किंवा आले तर थोड्याच वेळात पसार होतात, "ड्युटी' का लावल्याची विचारणा करतात... मग दोन महिन्यांपासून "कोरोना'शी मुकाबला करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी भार पेलावा का...असा प्रकार जिल्ह्यात घडत आहेत.
जळगाव, मालेगाव, नाशिक "कोरोना'चा "हॉट स्पॉट' आणि या ज्वालामुखीच्या तोंडावर धुळे शहर व जिल्हा असताना रोज काही ना काही समोर येणारे गंभीर प्रकार, धुळ्यात का होतात, यांचे उत्तर सकरारी यंत्रणा देईल का, जिल्ह्यातील सरकारी विभागात, महाविद्यालयासह रुग्णालयात आणि एकूणच जिल्हा सरकारी यंत्रणा म्हणून जे "टीम वर्क' असायला पाहिजे, ते दिसत नाही. कोरोना विषाणूशी मुकाबला सारे करीत आहे. जिल्ह्यातील विविध यंत्रणेतील अधिकारी, सरकारी डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र "कोरोना योद्धा' म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला प्रत्येकाचा सलाम आहे, असे असले तरी काही गंभीर उणिवांमुळे त्यांच्या कार्यावर कुठे तरी एक काळसर डाग गडद होताना दिसतो आहे.
शहरात पोलिस व कायद्याचा धाक का नाही, महापालिकेकडून जबाबदारीत होणारी चालढकल व बऱ्याच कार्यवाहीतील विलंब, हिरे महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, कर्मचारी कामच करताहेत आणि टाळाटाळ करणाऱ्यांना अभय का दिले जाते, तेथील सर्वच "स्टाफ' कौतुकास्पद सेवा देत असताना कारभारात उणिवा राहतात कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय यादव यांच्याकडील संयुक्त बैठकीवेळी त्यांच्यासह पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी हिरे महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून रुग्ण पळतोच कसा, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत खुलासा मागणारे पत्रही दिले. त्याला महाविद्यालयासह रुग्णालयाने केराची टोपली दाखविली. त्यावर समितीचे अध्यक्ष म्हणून यादव यांना अधिकार असूनही त्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही.
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून आतापर्यंत चार ते पाच "कोरोना'बाधित, संशयित रुग्ण पळाल्याने गंभीर चिंता व्यक्त होते. त्यामुळे राज्यात या स्थितीबाबत नाचक्की होताना दिसते. त्याचा प्रशासनासह महाविद्यालय व जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का लागत आहे. अशात मंगळवारी तर एका गंभीर घटनेने धुळेकरांच्या संतापाचा कळसच गाठला. "कोरोना'बाधित पतीचा सोमवारी (ता. 25) मृत्यू झाल्यानंतर त्याची संपर्कातील एकाकी पडलेली 43 वर्षीय पत्नी थेट हिरे महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयातून सकाळी नऊला घराकडे म्हणजे भाटपुऱ्याला (ता. शिरपूर) पायी निघाली. तिच्या घशाचे स्त्रावही तपासणीसाठी घेतले नव्हते. ही संशयित महिला अक्षरशः चटका देणाऱ्या 44 डिग्री सेल्सिअस तापमानात मंगळवारी 70 किमी अंतर कापत उपाशीपोटी पायी निघाली. ती सायंकाळी सहाला शिरपूर सहकारी सूतगिरणीजवळ पोहोचली. हा वेदनादायी प्रकार सरकारी यंत्रणेची अब्रू वेशीवर टांगणारा ठरल्याचे मानले जाते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.