नाशिक : महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्या अनुषंगाने सर्वच नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांची आस लागली आहे. या संदर्भात भाजपचे प्रभारी जयकुमार रावल यांनी काल नाशिकला भेट दिली. यावेळी भाजपचे काही नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वाटेवर असल्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना रावल यांनी दिल्याचे कळते.
रावल यांच्याकडे महापौर, शहराध्यक्षांसह गटनेत्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. समर्थकांच्या पुर्नवसनासाठी नेत्यांच्या रुसव्या फुगव्यांमुळे त्यांनी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वसान देत त्यातून सुटाक करुन घेतली. तक्रारकर्त्यांमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे श्री. सानप पक्षात खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्याचे बोलले जात असून, तक्रारींच्या माध्यमातून महत्त्वाच्या पदांबरोबरच शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याची रणनीती आखली जात आहे.
भाजपच्या अनेक नगरसेवकांचा ओढा महाविकास आघाडीकडे असल्याने या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पदभार काढून माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविला आहे. श्री. रावल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात नगरसेवकांची स्वतंत्रपणे बैठक घेतली. तीत माजी आमदार सानप समर्थक नगरसेवकांनी महापौरांसह शहराध्यक्ष, गटनेत्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद विकोपाला पोचल्याचे दिसून आले. सानप समर्थक नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांबरोबरच स्थायी समितीवरही अधिक प्रतिनिधित्व हवे आहे. याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष हे प्रमुखपद हवे असल्याने तक्रारींचा सिसेमीरा लावल्याचे बोलले जात आहे. एकीकडे तक्रारींचा पाढा वाचत असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याची कबुली देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समितीत भाजपचा एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप व विरोधकांचे आठ-आठ असे समसमान सदस्य बळ राहणार आहे. यामुळे शेवटच्या वर्षात भाजपच्या हातून स्थायी समितीची सत्ता जाण्याची भीती निर्माण झाल्याने त्यादृष्टीने श्री. रावल यांनी चर्चा केली.
फुटीर नगरसेवकांवर लक्ष
महापालिकेच्या ६४ नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करताना श्री. रावल यांनी चार वर्षांतील कामांचा आढावा घेतला. प्रभागात कोणती कामे केली, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली कामे, कुठल्या पदांवर काम केले आदींबाबत रावल यांनी चर्चा केली. ज्या नगरसेवकांना कुठलीच पदे मिळाली नाहीत, त्यांचा विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले. विषय समित्यांसह स्थायी समितीवर संधी मिळालेल्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली. पक्ष सोडून जणाऱ्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर वॉच ठेवला जाणार असून, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न होणार असल्याचे समजते.
...

