पुणे : नाशिक येथे मार्चमध्ये होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निधी कमी पडू नये यासाठी आमदारांच्या विकास निधीतून पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दहा लाखांचा निधी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र देऊन निधी तात्काळ वितरित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. हे साहित्य संमेलन होत असताना डॉ. गोऱ्हे यांना जो दहा लाखांचा निधी दिला आहे त्यांचे साहित्यिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे यांना साहित्याचा वारसा लाभला आहे. यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. `उरल्या कहाण्या` या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक मिळाले आहे. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी, शाश्वत विकास ऊद्दिष्टे व स्त्री पुरुष समानता अशी पंधराहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. विविध साहित्य संपादित केले आहे.
आमदार विकास निधीचा साहित्य संमेलनासाठी ऊपयोग आणि तोही नाशिकच्या संमेलनासाठी करता येणे हा एक त्रिवेणी संगम आहे अशी भावना डॉ. नीलम गोऱ्हें यांनी व्यक्त केली आहे.
बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांच्या घराण्याचा वारसा त्यांना आहे. आई लतिकाताई गोऱ्हे यांच्या परिवाराला कवी श्रीधर यांचा वारसा आहे. श्रेष्ठ कवी (कै) विंदा करंदीकर हे त्यांचे सासरे तर जेष्ठ लेखिका, कवियत्री (कै) विजया जहागीरदार या त्यांच्या आत्या आहेत. असा साहित्याचा समृद्ध वारसा त्यांना आहे. नाशिकचे आणि डॉ. गोऱ्हे यांचे खूप दृढ संबंध आहेत. त्यांचे वडील डॉ. दिवाकर गोऱ्हे परिवाराचे मुळ गाव नाशिक आहे. चांदवडची रेणुका देवी हे त्यांची कुलदेवी आहे. साहित्य संमेलनासाठी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
....

