पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे : अमोल कोल्हेंनी मानले उद्धव ठाकरे व अजित पवारांचे आभार

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
MP Amol Kolhe has thanked Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar
MP Amol Kolhe has thanked Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याबद्दल शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जनतेने पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिल्याची घोषणा केली. या प्रकल्पासाठी  गेले वर्षभर आपण युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसमोर प्रकल्पाच्या सादरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर त्याला मंजुरी मिळण्याची औपचारिकता बाकी होती. या प्रकल्पासाठी स्वतः अजित पवार आग्रही होते. रेल्वे मंत्रालयाने कर्ज उभारणी व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मंजुरी दिली होती. पण कोविडच्या संकटामुळे हा प्रकल्प लांबण्याची भिती होती. 

मात्र, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर या या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. सादरीकरण पाहिल्यानंतर त्यांनी प्रकल्पाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अखेर अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. 

डॉ. कोल्हे म्हणाले की, आता हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार आहोत. या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर चाकण येथे इंडस्ट्रीयल रॅक तर नारायणगाव येथे कृषी उत्पादनांसाठी रॅकची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतमाल देशभरात पोहोचविण्यासाठी उपयोग होईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. 

त्याचप्रमाणे उत्तर पुणे जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठीही फायदा होईल. हा प्रकल्प शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कॉम्प्रिहेंन्सिव्ह मोबिलिटी प्लानच्या दृष्टीनेही दूरगामी परिणाम करणारा ठरेल, अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा :

- ग्रामीण भागात सामूहिक वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी, कंपोस्टिंगसाठी अनुदान आदी कामांचा या योजनेत समावेश केला आहे. 

- राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 राबवण्यात आली. त्याअंतर्गत 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार 929 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

- शासनाने 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 2021 पासून शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुविधा नाहीत. त्यांच्या बळकटीकरणासाठी चार वर्षात सुमारे 2 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. 

- पैसे भरूनही कृषीपंप. वीजजोडणी मिळाली नाही, त्यांना कृषी पंप वीज जोडणी धोरण राबविणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीला दरवर्षी 1500 कोटी देणार भागभांडवल स्वरूपात देण्यात येणार आहेत. 

- थकित वीजबिलात शेतकयांना 33 टक्के सुट देण्यात आली आहे. उर्वरित थकबाकीचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास त्यांना राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरिक्त माफी दिली जाईल. सुमारे 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांच्या मुळ थकबाकीच्या 66 टक्के म्हणजे 30 हजार 411 कोटी रुपये इतकी रक्कम माफ केली जाणार आहे.

- विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत शेतमालाच्या बाजारपेठ व मुल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकुण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यातून शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी 1 हजार 345 मुल्यसाखळी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. 

- विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील वरूड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. 

- मराठवाड्यात मोसंबीची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. 

- स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 500 अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- कृषी संशोधनासाठी राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी प्रमाणे तीन वर्षात 600 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

- बर्ड फ्लु रोगनिदानासाठी पुण्यात उच्चश्रेणी जैवसुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com