जळगाव : रावेर शहरात जवळच असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा खून झाल्याचे आढळून आले आहे. चौघांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले असता घरात चारही मुले एकटी होती. त्यातील सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
याबाबत विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे.
पोलिस अधीक्षक व श्वान पथक रवाना
गंभीर घटना असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक हे घनास्थळी रवाना झाले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे घटनास्थळी उपस्थित आहेत.
पाच वर्षापुर्वी जळगाव शहरा जवळील भादली गावात एकाच कुटूबांतील चार जणांची हत्या झाली होती. अद्यापपर्यंत या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. आज झालेल्या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.