नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरात किमान एक तरी जागा मिळावी, यासाठी आपण आग्रही होतो. मात्र, कॉंग्रेसने शेवटपर्यंत आपल्याला झुलवत ठेवले. मी गोंदियाला जाताच चित्र बदलले. राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही. त्यावेळी माझी चूक झाली, अशी कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
दरम्यान, राज्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त आहे, असे निदर्शनास आणून देऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे आपण मोठा भाऊ असल्याचे या वेळी सूचित केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक सोमवारी (ता. 19 ऑक्टोबर) बिजलीघरच्या हिरवळीवर घेण्यात आली. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे सर्वच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्या वेळी माजी केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते.
ताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काही मिळत नाही. मात्र, त्याकरिता आधी स्वतःला ताकद दाखवावी लागते. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दहा-बारा जागांवर राष्ट्रवादी समाधान मानणार नाही, असा इशारा कॉंग्रेसला देऊन प्रफुल्ल पटेल यांनी त्यादृष्टीने उमेदवार तयार करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेला आज तब्बल 22 वर्षे झाली. विदर्भात पक्षाची ताकद वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे. महाआघाडीतील प्रमुख पक्षाचा नागपूर महापालिकेत फक्त एक नगरसेवक निवडून येतो, ही लाजिरवाणी बाब आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी कायम राहावी, याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. मात्र सन्मानच मिळणार नसेल तर वेगळी भूमिका घ्यावीच लागले, असेही पटेल म्हणाले.
जिल्हा परिषदेची निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित लढवली होती. सत्ता आल्यावर कॉंग्रेस बदलली. एकही सभापतिपद देण्यास नकार दिला. पर्याय नसल्याने राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली. मात्र, यापुढे असे घडू नये, याकरिता आपणासही ताकद दाखवावी लागेल, असे माजी केंद्रीय मंत्री पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा : धान उत्पादकांना बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य : प्रफुल्ल पटेल
भंडारा : मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. कोरोनाच्या संकटाशी सामना करताना महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात सापडले आहे. सरकारने कोरोनाचा प्रसार आणि प्रदूर्भाव थांबविण्यात खर्च करीत आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणूक जवळ येत असून महाराष्ट्रात सेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार नसल्याचं मत या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.