गोंदिया : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनावर जोरदार प्रहार केला होता. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राणे यांना टोला लगावला आहे. (Congress state president Nana Patole criticizes Narayan Rane)
पटोले आज (ता. २६ जुलै) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सांधला त्यावेळी ते म्हणाले की ''नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो, पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पूरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू असे'', असे पटोले म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की ''मी विधानसभा अध्यक्ष असताना पहिला ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडला होता. मात्र, ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणनाही करणार नाही आणि आकडेसुधा देणार नसल्याचे केंद्रिय गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल केंद्राचा किती राग आहे. हे लक्षात येते असा आरोप पटोले यांनी केला.
नारायण राणे काय म्हणाले होते.
''पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राणे यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पण राज्य सरकारनंही तातडीने मदत जाहीर करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. ठाकरे सरकारला उद्देशून ते म्हणाले, सारखे केंद्र-केंद्र काय करता, राज्य सरकार कशाला आहे मग? केंद्राकडे द्या ना राज्य चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असे राणे म्हणाले.
राज्याला मदत देता येत नाही का? केंद्राकडे मागितल्यानंतर केंद्र मदत देतेच. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्राचे कौतुक केले. आज ते विनम्र झाले. आम्ही याचे राजकारण करत नाही. ज्यांना राजकारण करता येत नाही, त्यांच्याशी करत नाही. आमच्या तोडीच्या लोकांशी आम्ही राजकारण करतो, असे टोला राणे यांनी लगावला. बाजापेठेत मी फेरी मारली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानात काही राहिले नाही. बाजारपेठेत भयावह परिस्थिती आहे.
लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. 2005 साली झालेल्या स्थितीपेक्षा भयावह स्थिती यावेळी आहे. विविध योजनांतून शक्य तेवढी मदत केली जाईल. ही आमची माणसे आहेत, त्यांच्या डोळ्यात भविष्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ, असं राणे म्हणाले. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना विचारत होती, पण काही सांगितले नाही. कोणताही इशारा दिला नाही, असे राणे यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.