कर्जत : कर्जत शहरातून जाणाऱ्या भिगवण-खेड-अमरापूर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन दोघांनाही पाठविण्यात आले आहे. आता दोघांपैकी कोण न्याय देणार? याकडे लक्ष लागले आहे.
सध्या कर्जत शहरातून या रस्त्याचे काम सुरू होणार असून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळ्यांना खुणा करण्यात आल्याने या व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या गाळेधारकांच्या संतापाचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. हा रस्ता शहराबाहेरून बायपास करून नेण्यात यावा, असा पर्याय सुचविण्यात आला आहे.
नामदेव राऊत यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा असणारे गाळेधारक (टपरी) सुमारे पन्नास वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. येथे सर्वसामान्य युवक व्यवसाय करीत असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. तसेच, काही त्यांच्याकडे कामाला आहेत, त्यांचीही या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी कर्ज व उसनवारी करून हिमतीने व्यवसाय उभे केले आहेत.
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हे व्यावसायिक अडचणीत आहेत. कर्जाचे हप्ते थकल्याने चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला खुणा केल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
उपनगराध्यक्ष राऊत यांनी पुढे म्हटले आहे की या पूर्वी 1996-97 मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणावेळी बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीलगतलगतच्या गाळ्यांची रांग तत्कालीन मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांतून "जैसे थे' ठेवण्यात यश मिळविले होते. त्याच पद्धतीने या 325 गाळेधारकांना न्याय द्यावा; अन्यथा गाळेधारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील.
आमदार पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या अगोदर या रस्ताच्या रुंदीकरणावेळी तत्कालीन आमदार (स्व.) विठ्ठलराव भैलुमे यांनी प्रयत्न केले. तसेच, मी सरपंच व उपसरपंच असताना तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे व प्रा. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून यश मिळविले होते. आजतागायत या सर्व कुटुंबाची उपजीविका या गाळ्याच्या माध्यमातून सुरू आहे.
राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण आमदार असल्याने न्याय देऊ शकता. शहरात शॉपिंग सेंटर उभारणार आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, ते एस टी महामंडळ, जिल्हा परिषद, नगरपंचायत वा शासकीय जागेत उभारले तर ते मालक असतील. मात्र, सध्या या जागेतील गाळ्यांचे संबंधित गाळेधारकच मालक आहेत. शहराला पर्यायी मार्ग बायपाससाठी दोन तीन पर्याय आहेत. तो करून या गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.