पंतप्रधान म्हणाले, दिलीप गांधी यांनी महाराष्ट्रात भाजपच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणतात, महाराष्ट्रात भाजपाला बळकट करण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयत्न केले.
dilip gandhi.jpg
dilip gandhi.jpg

नगर : नगरचे माजीमंत्री दिलीप गांधी यांचे आज पहाटे दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल भाजपमधून दुःख व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी (कै.) दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

कोविंद यांनी ट्विट करून म्हटले आहे, की पूर्व केंद्रीयमंत्री दिलीप गांधी के निधन के बारे में सुनकर अत्यंत दुःख हुआ, अहमदनगर से तीन बार लोकसभा सांसद रहे श्री गांधी, एक लोकप्रिय जनसेवक थे. जो अहमदनगर और महाराष्ट्र के विकास के लिए सदैव प्रयत्नशील रहे. मैं. उनके स्वजनों एवं शुभचिंतकों के प्रति संवेदना व्यक्त करता हू. 

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणतात, महाराष्ट्रात भाजपाला बळकट करण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयत्न केले.

दिलीप गांधी यांनी संपूर्ण जीवन जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित केले, असे गृहमंत्री शहा यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

गडकरी यांनीही ट्वीट करीत गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माझ्या सदभावना त्यांच्या कुटुंबियासोबत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे, की गांधी यांनी शेतकरी व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी काम केले.

सर्वसामान्य कार्यकर्ता ते केंद्रीयमंत्री

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात पाय भक्कमपणे रोवणे तसे कठिणच. परंतु काही नेते मात्र आपल्या जिद्द व कष्टातून हे साध्य करून दाखवितात. त्याचेच उदाहरण म्हणजे भाजपचे नेते माजी केंद्रीयमंत्री (कै.) दिलीप गांधी होय.

गांधी यांचे आज कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले. त्यांच्यावर उद्या (ता. 18) दुपारी 4 वाजता नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गांधी यांचा राजकीय जीवनप्रवास थक्क करणारा आहे. एक सर्वसामान्य व्यापाऱ्याचा मुलगा ते राजकीय जीवनात पदार्पण करून थेट मंत्रीपदापर्यंत मजल मारणारा नेता, अशी त्यांची ओळख सर्वांना ज्ञात आहे. नगरच्या राजकीय वर्तुळातील नगर जिल्ह्यातून थेट दिल्लीश्वराशी कोणाचे चांगले संबंध आहेत, असा ज्या वेळी विषय निघायचा, त्या वेळी गांधी यांचेच नाव अग्रक्रमावर असायचे.

गांधी यांचा राजकीय प्रवास अहमदनगर नगरपालिकेपासून सुरू झाला. नगरसेवक झाल्यानंतर 1985 मध्ये ते गटनेता झाले. तसेच उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस, नगर जिल्हाध्यक्ष, युवा मार्चोचे अध्यक्ष अशा विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी जनतेची कामे केली.

अहमदनगर जिल्हा मतदारसंघातून (दक्षिण) गांधी तीनदा खासदार झाले. 1999, 2009 व 2014 मध्ये ते खासदार झाले. या दरम्यानच्याकाळात ते वित्त मंत्रालयाच्या समितीचे सदस्यही होते. 2003 मध्ये त्यांनी केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री म्हणून काम पाहिले. मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली, तरीही त्यांनी पक्षाच्या आदेशाने संबंधित उमेदवाराचा प्रचार केला. 1998 सालापासून ते नगर अर्बन बॅंकेचे संचालक होते. 2003 मध्ये अध्यक्ष झाले. पुन्हा 2012 पासून 2019 पर्यंत त्यांनी बॅंकेचे अध्यक्षपद भूषविले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com