पालकमंत्र्यांनी जिल्हा बोर्डिंगमध्ये टाकला, सवडीने भेटायला येतात : खासदार डॉ. विखे यांचा टोला

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोविड रुग्णांचे हाल सुरू असताना जिल्ह्यातील मंत्री काय करतात, असा सवाल केल्यानंतर तीनही मंत्री जागे झाले.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

शिर्डी : "मुंबईत दोन लाख रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आलेत. जिल्ह्यातील तीनही मंत्री त्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला किमान पाचशे इंजेक्‍शन का देऊ शकत नाहीत? बैठका आणि फोटोसेशन करून कोविडचे नियंत्रण होणार नाही. ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. कुणाचाच कुणाला मेळ नाही. पालकमंत्र्यांनी कोविड काळात नगर जिल्हा बोर्डिंगमध्ये टाकला, सवड झाली की भेटायला येतात, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

ते म्हणाले, ""आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोविड रुग्णांचे हाल सुरू असताना जिल्ह्यातील मंत्री काय करतात, असा सवाल केल्यानंतर तीनही मंत्री जागे झाले. अधिकाऱ्यांच्या एकत्र बैठका घेण्याऐवजी स्वतंत्र बैठका घ्यायला लागले. अधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्यांचा वेळ का घेता? मंत्री म्हणून तुमचे योगदान काय, ते सांगा.'' 
""प्रत्येक मंत्री व आमदाराने आपल्या तालुक्‍यात कोविड रुग्णालय उभारावे. भारतीय जनता पक्ष राज्य सरकारसोबत आहे. या संकट काळात राजकारण नको, ही भूमिका आहे. "लॉकडाउन'साठी मुहूर्त शोधता का? "हो' किंवा "नाही' हे एकदाचे जाहीर तर करा,'' असा टोला त्यांनी सरकारला लगावला. 

कोविड रुग्णालयात बेड नाहीत

साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. जिल्ह्यातील रुग्ण येथे आणण्यास शिर्डीकरांचा विरोध आहे. कुणाला राहाता तालुक्‍याबाहेरील रुग्णांची व्यवस्था करायची असेल, तर त्यांनी येथील धर्मशाळेची इमारत घेऊन तेथे स्वतंत्र उपचारयंत्रणा उभारावी. तालुक्‍याच्या नियोजनात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करण्यास आपला व शिर्डीकरांचा विरोध राहील. 
- खासदार डॉ. सुजय विखे पाटील 

हेही वाचा...

बाधितांची बेफिकिरी दुसऱ्या दिवशी उघड 

कर्जत : शहरात राहत असलेल्या एका परप्रांतीय कुटुंबातील पाचही सदस्य कोरोनाबाधित निघाले. त्यानंतर ते सर्वच जण गायब झाले. ते त्यांच्या गावी गेल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर "सील' केला असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 

शहरातील एका कुटुंबातील पाच सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरपंचायतीतर्फे संबंधित घर पत्रे ठोकून "सील' करण्यात आले. मात्र या घरातील सर्व जण कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, हे कुटुंब शहरातील अनेकांच्या संपर्कात आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com