कोरोना कमी होतोय, बाजारपेठ खुली करा : स्नेहलता कोल्हे यांचे साकडे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
Snehalata kolhe.jpg
Snehalata kolhe.jpg

कोपरगाव : लॉकडाउनमुळे कोपरगावची बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल करून कोपरगावची संपूर्ण बाजारपेठ खुली करावी,'' अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. कोरोना व उपासमार, अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. खते, बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी शहरात येत आहेत. बाजारपेठ बंद असल्याने त्यांना शेतीसाहित्याची खरेदी करता येत नाही. 

वास्तविक, सकाळच्या वेळेत काही दुकाने उघडी असतात; परंतु त्याच कालावधीत शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू असतात. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू, तसेच शेतीपूरक साहित्याची दुकाने पूर्ण वेळ सुरू केल्यास अर्थकारणाला गती मिळेल. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी कोल्हे यांनी निवेदनात केली आहे. 

हेही वाचा...

वैद्यकीय अधिकाऱ्यावरील कारवाईस स्थगिती 

राहुरी : वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांच्यावरील कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना संकटात कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करण्याची संधी त्यांना दिली आहे. 

तहसीलदार शेख यांनी याबाबत दुजोरा देताना सांगितले, की वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक यांच्याकडे शासनाच्या राहुरी येथील बालाजी मंदिरातील ऑक्‍सिजन बेड असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोज सायंकाळी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतात. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक मागील आठ-दहा दिवसांपासून बैठकीला गैरहजर राहिले. त्यांना वारंवार सूचना देऊनही वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. 

कोरोनाच्या संकटात शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना एक संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com