मुंबई : महाआघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांच्यातील पारनेरमधील पक्षांतरावरून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी भेटही घेतली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार निलेश लंके या वेळी उपस्थित होते.
त्या बैठकीत नगरसेवकांनी पारनेरचा पाणीप्रश्न मांडला. तसेच शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्याबद्दल पाचपानी निवेदन दिले. त्यावर उद्धव ठाकरे या नगरसेवकांना तुम्ही मला हे आधी का सांगितले नाही, असा प्रश्न विचारला. तब्बल 45 मिनिटांचा वेळ ठाकरे यांनी या नगरसेवकांना दिला. प्रत्येक नगरसेवकाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. मुद्दस्सीर सय्यद, वैशाली औटी, नंदा देशमाने, नंदकुमार देशमुख आणि किसन गंधाडे अशी या नगरसेवकांची नावे आहेत.
शिवसेनेच्या पारनेर मधील स्थानिक नेतृत्वाबाबत या नगरसेवकांनी नाराजी या वेळी व्यक्त केली. पारनेरचा पाणी प्रश्न मोठा आहे. तो सोडविण्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिल्याने आम्ही राष्ट्रवादीत गेलो होतो, असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. यावर ठाकरे यांनी हे तुम्ही मला आधी का सांगितले नाही. आपले महाआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे अशा पक्षांतराची गरज नव्हती. मी पारनेरच्या पाणीप्रश्नात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले.
ठाकरे यांना भेटण्याआधी हे नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटले. पवार यांनीही त्यांची समजूत घालत हे महाआघाडीचे सरकार असल्याने असे पक्षांतर योग्य नसल्याची भूमिका या नगरसेवकांना समजावून सांगितले. नार्वेकर पवार यांच्याकडेही उपस्थित होते. तेथून हे सर्व `मातोश्री`वर गेले.
महाविकास आघाडी ही एकसंघ आघाडी असून नगरसेवकांचे परत जाणे हा कुणाचाही विजय किंवा पराजय नाही तर ती एकपणाची खूण असल्याची प्रतिक्रीया आहे असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. स्थानिक नेते माजी आमदार विजय अौटी यांच्यावर नाराज झाल्यामुळे हे पक्षांतर झाले होते असे लंके यांनी वारंवार सांगितल्याने शिवसेनेनेही विषय जाहीरपणे पेटवला नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही असेच मत व्यक्त करत अजितदादांनी सेनेचे नगरसेवक पळवले नाहीत, असे मत मांडले होते. दुसरीकडे `मातोश्री`वरून मात्र या नगरसेवकांना परत आणण्याचा ठामपणा घेतला होता. दोन्ही पक्षांत एकवाक्यता रहावी यासाठी हा निर्णय घेण्याचे राष्ट्रवादीने ठरवले होते. पारनेरचे पक्षांतर हा काही राष्ट्रीय किंवा राज्याचा विषय नसल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल व्यक्त केले होते. त्यामुळे या विषयावरून एक पाऊल मागे घेण्याचे राष्ट्रवादीने ठरवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकत्र आहेत. त्यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा संदेश या घरवापसीमुळे गेला. मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी झाली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.