हा किती दुटप्पीपणा; मराठा आरक्षण कायदा करतेवेळी तुम्ही आमच्या सोबत होता.....

मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय वादाचा ठरलाय...
uddhav-devendra
uddhav-devendra

मुंबई : मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना थांबण्याची चिन्हे नाहीत. या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना भेटले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा कायदा फूलप्रूफ असता तर राज्यपालांना भेटण्याचा योग या प्रश्न आला नसता, असा टोला भाजपला लगावला. (Delegation under the leadership of CM Udhhav Thackeray meets governor on Maratha Reservation)

त्याला तातडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा? मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्यमंडळाने मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, ही मागणी राज्यपालांकडे केली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मराठा आरक्षणासंदर्भात माध्यमांशी बोलले.

पंतप्रधानांची भेट घेणार

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने ही भेट होती. न्यायालयाने सांगितले आहे की, आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार, राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती व केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी, आमच्या भावना तिथपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेण्याचेही आम्ही ठरवले आहे. त्यांच्याकडेही आरक्षणाची मागणी केली जाईल. आज राष्ट्रपतींनाही पत्र दिले आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळायला हवे, ही आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कायदा फुलप्रुफ असता तर...

कायदा फुलप्रुफ असता तर राज्यपालांना भेटण्याचा योग आला नसता. नुकतेच पत्र दिले आहे, त्याचे उत्तर लवकरात लवकर मिळावे. तसेच त्यावर लवकर निर्णय व्हावा, ही अपेक्षा आहे. राज्यपालही आमच्या मागणीशी सहमत आहेत. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर यावा, असेच अपेक्षित असायला हरकत नाही. कायदा फुलप्रुफ असता तर आज त्यासाठी हा योग आला नसता, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com