मुंबई : "केंद्र सरकारने 2021-22 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषी क्षेत्राला नवसंजीवनी, तर मजूर-कामगार-गरिबांना आर्थिक न्याय देणारा आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेकडे भारताचे अर्थचक्र अग्रेसीत करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे. सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन,'' अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.
आठवले म्हणाले की, यंदाच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, कामगार, दलित, अल्पसंख्याक अशा सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याचे महत्वपूर्ण विचाराचे सूत्र प्रकर्षाने दिसत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर्वांचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या मोठे राष्ट्र आपला भारत आहे. या प्रचंड लोकसंख्येचा कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात होता. त्या सर्वांच्या जीवाची जपणूक करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आले.
आता यंदाच्या क्रांतिकारी अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय दिला जाणार आहे. शेतकरी, मजूर आणि कामगारांना तर या अर्थसंकल्पातून नवसंजीवनी देण्यात आली आहे. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य गरीब आणि दलित मागासवर्गीय आदींचे हित लक्षात घेऊन अत्यंत चांगला आणि आर्थिक बळ देणारा, आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशा पद्धतीने आठवले यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.