मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे; म्हणून भारतीय जनता पक्षाने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा भारतीय जनता पक्षासाठी धक्का मानला जात आहे, तर विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेस पक्षाकडेच राहणार आहे, त्यामुळे काँग्रेससाठी हा दिलासादायक निर्णय आहे. (Supreme Court has rejected petition by BJP seeking the Leader of Opposition post in Mumbai Municipal Corporation)
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संख्याबळानुसार भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. मात्र, तेव्हा राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला नव्हता. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हे पद कॉंग्रेसला मिळाले. सध्या कॉंग्रेस पक्षाचे रवी राजा हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता.
शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे पद भारतीय जनता पक्षाला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने कॉंग्रेसच्या बाजूने निर्णय दिला होता. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. पण, त्या निकालानंतर भाजपकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आता कॉँग्रेस पक्षाकडेच कायम राहणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.