ट्वीटरचा वापर करुन भाजपने निवडणुका जिंकल्या; आताच मोदी सरकारचा विरोध का?

यामुळे अनेक ठिकाणी ट्विटरच्या रणमैदानातून भाजपला आणि त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे.
 Narendra Modi .jpg
Narendra Modi .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षासाठी ट्विटरचे राजकीय महत्व आता संपले आहे. जे ट्विटर कालपर्यंत भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारसाठी राजकीय लढ्याचा अथवा प्रचाराचा आत्मा होता, ज्याच्या अतिरेकाचा वापर करूनच भाजप 2014 मध्ये निवडणुक जिंकली. तेच ट्विटर आता भाजपसाठी ओझे झाले. हे ओझे कायमचे फेकून देण्याच्या निर्णयाप्रत मोदी सरकार आले आहे. कारण आता भाजपविरोधकांनी या माध्यमाचे कोपरे बळकावले आहेत. भाजपच्या (Bjp) खोट्या-नाट्या प्रचाराला उत्तर द्यायला सुरुवात केली, असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. (Shiv Sena criticizes the central government)

यामुळे अनेक ठिकाणी ट्विटरच्या रणमैदानातून भाजपला आणि त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे. शिवसेनेचे 'सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि ट्विटर संघर्षावर भाष्य केले. ट्विटर ही काही देशासाठी जीवनावश्यक वस्तू किंवा अत्यावश्यक सेवा नाही. जगातल्या अनेक देशांत 'ट्विटर'चा 'ट'ही लोकांना माहीत नाही. चीन आणि उत्तर कोरियात ट्विटर नाही. नायजेरियानेही या समाजमाध्यमाची त्यांच्या देशातून हकालपट्टी केली आहे. 

ट्विटरवरून आता देशातही वादळ उठले आहे. कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा प्रचाराचा आत्मा होता. देशातील सर्व मीडिया, प्रचार-प्रसारमाध्यमे मोदी सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहेत, मात्र, ट्विटरसारखी माध्यमे बेलगाम आहेत. त्यावर मोदी सरकार व भाजपचे नियंत्रण नाही. त्यांना भारताचा कायदा लागू नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांसाठी एक कठोर नियमावली जारी केली. त्या नियमावलीचे पालन करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशारा सरकारने देऊनही ट्विटरवाले ऐकायला तयार नाहीत. आमचा कायदा आणि आमचे न्यायालय अमेरिकेत. तुमच्या भूमीचा कायदा मान्य नसल्याचे ट्विटरवाले सांगतात.

या समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपच होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती, तेव्हा या कार्यात २०१४ मध्ये भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या. भारतातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता," असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या ते करताना राजकीय विरोधकांची बदनामी करण्यात येत होती. त्या काळात काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या 'ट्विटरचा' वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले, तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. 

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, डेरेक ओब्रायन या जोडीने 'ट्विटर'च्या दुधारी तलवारीने भाजपला घायाळ केले. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून मोदी व नितीश कुमारांना उघडे केले. राहुल गांधी व प्रियांका गांधी या ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला 'जोर का झटका धीरे से' देत असतात व त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतात. जसे उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील 'ब्लू टिक' हटवताच केंद्र सरकारने ट्विटरशी भांडण सुरू केले. त्यावर राहुल गांधी यांनी शुद्ध हिंदीत ट्विट केले की, ''ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड रही है - कोविड टिका चाहिए तो आत्मनिर्भर बनो!'' हा शब्दबाण घायाळ करणारा आहे. बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली यावर भाजप, पंतप्रधान कार्यालयाने नाराजी व्यक्त केली.

त्यावेळी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर झोकात लिहिले, ''मोदीजी, देशाची जनता गेल्या सात वर्षांपासून खात्यात १५ लाख जमा होण्याची वाट पाहत आहे. आपणास अर्धा तास वाट पाहावी लागली तर मनावर का घेता?'' हे व असे अनेक शब्दबाण सरकार किंवा भाजपवर सुटत आहेत आणि भाजप त्याबाबतीत आक्रोश करीत, असे म्हटले आहे. 
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com