विरार : अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे हृदय रोग, कॅन्सर, किडनी यासारख्या गंभीर व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही उपनगरी लोकल गाड्यांमधून प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. मच्छीमार, भाजी विकणारे शेतकरी, दूध विकणारे यांनाही रेल्वे सुविधा उपलब्ध करा, आता खरे म्हणजे अनलॉकिंगच्या काळात सर्वांनाच रेल्वेसेवा सुरु केली पाहिजे. मात्र निदान रुग्णांना तरी रेल्वेत तातडीने प्रवेश द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लॉकडाऊन चे नियम शिथिल केल्यानंतर अनेक उद्योग सुरु झाले आहेत. तरीही ज्यांचे हातावर पोट आहे असे मच्छीमार, भाजी विकणारे शेतकरी, दूध विक्रेते यांना मात्र आपला व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकल बंद असल्याने त्यांना खाजगी वाहन किंवा मग बससेवेवर अवलंबुन राहावे लागते. यात त्यांना मोठा उशीर होतो. दूध, फुले, भाजी, मासळी हे नाशवंत असल्याने ते वेळेत बाजारात गेले नाही तर त्याचा फटका या विक्रेत्यांना बसतो.
या परिसरातील कितेक गंभीर रुग्णांवर मुंबईतील के ई एम, जे जे, टाटा, नायर, भगवती यासारख्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु सार्वजनिक परिवहन सेवा बंद असल्याने रुग्णांचे हाल होतात, असेही त्यांनी दाखवून दिले आहे.
आता जुलै मध्ये सरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली व त्याचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. सरकारी कर्मचारी, तसेच रुग्णालय कर्मचारी आदींना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण रुग्णांना मात्र लोकल प्रवास नाकारण्यात आला, त्यामुळे केवळ वसई विराराच नव्हे तर थेट डहाणू, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ, आसनगाव, वाशी, बेलापूर, पनवेल इथल्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी येणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत रुग्णांना प्राधान्याने रेल्वेप्रवासाची परवानगी मिळावी, असे ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आवाहन
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती जनतेने घरातच राहून त्यांच्या विचारांचे, कार्याचे, साहित्याचे चिंतन करून साजरी करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
Edited by swarup jankar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.