मुंबई ः सामान्य मुंबईकरांनाही खेळाची मैदानं, जलतरण तलाव, उद्यानं पाहायला मिळावीत. त्याचा लाभ घेता यावा, या हेतूने बाळासाहेब ठाकरे यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखालील मुलुंडमधील जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्टाच्या खासगीकरणाचा घाट महापौरांच्या माध्यमातून घातला जात आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या हेतूला हरताळ फासला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी केला. (Nitesh Rane's letter to CM on privatization of swimming pool, badminton court)
नीतेश राणे यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात अनेक आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात राणे यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी काळाची पावलं ओळखली होती. ही मुंबई फक्त धनदांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकरांनाही खेळाची मैदानं, जलतरण तलाव, उद्यानं पाहायला मिळावीत. त्याचा लाभ घेता यावा. तिथं आपली कौशल्य विकसित करता यावीत, यासाठी त्यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच आता भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय, असा आरोप सामान्य नागरिक करत आहेत.
या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा जलतरण तलाव आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी; म्हणून यावर महापालिकेचे नियंत्रण असावे, असे बाळासाहेबांना वाटत होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर, तर उपाध्यक्ष हे महापालिका आयुक्त असतील, अशी तजवीज करून ठेवली होती. सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबांचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु आता मात्र तसे राहिलेले दिसत नाही, असा दावाही नीतेश यांनी पत्रात केला आहे.
ते पत्रात म्हणतात की, या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून देवेंद्रकुमार जैन नियुक्त झाल्यानंतर स्वीमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्ट यांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. यातली विशेष महत्वाची बाब म्हणजे देवेंद्रकुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही. जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट ‘विकायला' निघाले आहेत. ते कुणाच्या घशात घालायचे आहेत, हेही अगोदरच ठरले असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. म्हणजे अभिरूची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा का याचं खासगीकरण झालं की यात काम करणाऱ्या १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना उद्धवस्त केले जाणार हे स्पष्ट आहे, त्यातील निम्मे कर्मचारी हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत.
मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. जलतरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आहे. यामुळे नफ्यात चालणाऱ्या जलतरण तलावाचे खासगीकरण कशासाठी? आणि कुणासाठी? हे जलतरण तलावाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी आणि हे खासगीकरण थांबवावे; अन्यथा आम्ही प्रतिष्ठानचे १००० कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.