मुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी 15 दिवसांसाठी (चौदा एप्रिल ते 30 एप्रिल) संचारबंदी करण्यात आली आहे. सध्या रात्रीची असलेली संचारबंदी दिवसादेखील लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला दिलेल्या संदेशात जाहीर केला. अनावश्यक सर्व कामे, उद्योग बंद राहणार असल्याचे त्यांनी घोषित केले.
राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला अटकाव करण्यासाठी ब्रेक द चेनची मोहीम राबविली जात आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांचा लॅाकडाउन जाहीर केला आहे. यावर भाजपचे नेते आमदार नितेश राणे Nitesh Raneयांनी टीका केली आहे.
आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात की, 'कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा' असे टि्वट राणे यांनी केले आहे. 'मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल,' असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.
राज्य सरकारने 14 एप्रिलच्या रात्री आठपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला असून सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यात लग्नासाठीची उपस्थितांची संख्या 50 वरून 25 वर करण्यात आली आहे. याशिवाय दिवसाही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
राज्यात आजपासून बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश काल प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.