मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी इंधन दरवाढ अशा विविध मुद्यांवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. या मुद्यांवरून त्यांनी केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार, असा सवाल केला आहे. तर काँग्रेसने ''लल्ला लल्ला लोरी, खाली है कटोरी..'' म्हणत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
जंयत पाटील यांनी आज जागतिक निद्रा दिनाचे औचित्या साधत केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सुमारे ३०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पाटील यांनी ट्विटमध्ये केला आहे.
कोरोनानंतर देशातील बेरोजगारीचा प्रश्नही बिकट झाल्याचे चित्र आहे. तसेच मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरही सातत्याने वाढत आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या पार गेले आहेत. विरोधकांकडूनही त्यावरून सरकारला सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
पाटील यांनी आज ट्विट करून या सर्व मुद्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली. ''शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?'', असे ट्विट पाटील यांनी केले आहे.
काँग्रेसकडून मोदींचा फोटो ट्विट
जागतिक निद्रा दिनानिमित्त काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगा करतानाचा निद्रा स्थितीतील फोटो ट्विट केला आहे. ''लल्ला लल्ला लोरी, खाली है कटोरी, मोदीजी ने बेच दी, देश की तिजोरी'', असे फोटोवर लिहित काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.