मुंबई : 'किशोर वाघ यांच्यावर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 मध्ये याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.
वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळले जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत भाष्य केले.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या...
मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ''किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 मध्ये याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपत गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये''. मिटकरी यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.
आ.चित्राताई,श्री किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता.
आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात.त्यामुळे दिशाभूल करू नये. pic.twitter.com/0JuGDXjGBN— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 27, 2021
टीकटॅाक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर चित्रा वाघ यांनी सरकारला दारेवर धरले आहे. राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे वाघ यांनी यापूर्वी अनेकवेळा बोलून दाखवले आहे. या पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरु आज मिटकरी यांनी वाघ यांच्यावर टीका केली. तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका, अशा शब्दांत वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीकेचा बाण सोडला.
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
''लाच घेतल्याचे प्रकरण घडले त्यावेळी माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. 2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला''?, असा सवाल वाघ यांनी विचारला.
कोरोना नसतांनाही खासगी लॅबकडून पाॅझिटिव्ह अहवाल!
''एसीबीने ज्या प्रकारे तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात असल्याचे वाघ म्हणाल्या. पण, मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत 20 वर्षे काम केले आहे, हे विसरु नका'', असेही वाघ यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

